टेलिव्हिजनवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो असणाऱ्या ‘नच बलिये’ कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सरु आहे. या शोमध्ये परिक्षकापासून ते कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांपर्यंत अनेक चर्चा रंगताना दिसत आहे. एप्रिलपासून या कार्यक्रमाचे आठवे पर्व सुरु होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमध्ये कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेली विनोदी कलाकार भारती सिंग तिच्या होणाऱ्या पतीसोबत म्हणजेच हर्षसोबत या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या कार्यक्रमासाठी एका भागासाठी ती तब्बल ३० लाख रुपये मानधन घेणार असल्याचे समजते. ही रक्कम आतापर्यंतच्या पर्वातील सर्वाधिक रक्कम असल्याचे बोलले जात आहे. भारतीने विनोदाच्या व्यासपीठावर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच कपिल आणि कृष्णासोबतच विनोदी कलाकारांच्या कलाविश्वात भारतीचेही नाव घेतले जाते. टेलिव्हिजन कार्यक्रमाच्या एका भागासाठी ती २५-३० लाख रुपयांचे मानधन घेते.

भारतीच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगायचे तर, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या ‘रिआलिटी शो’चे सुत्रसंचलन करत आहे. याशिवाय, ‘कॉमेडी नाईट्स’ आणि ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्येही ती काम करत आहे. यापूर्वी भारती ‘झलक दिखला जा’ या डान्स शोमध्ये दिसली होती. मात्र, नच बलियेच्या सेटवर ती पहिल्यांदाच होणाऱ्या पतीसोबत धम्माल करताना दिसणार आहे. प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंग या वर्षाच्या अखेरीस प्रियकर हर्षसोबत विवाह करणार आहे. भारतीसोबतच या कार्यक्रमामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव पत्नीसोबत कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

‘नच बलिये’ कार्यक्रमाविषयी बोलायचे तर, सध्या आठव्या पर्वात या कार्यक्रमात अधिक उत्साह दिसत आहे. सेलिब्रेटी जोडप्यांचा सहभाग असणाऱ्या या कार्यक्रमामध्ये बॉलिवड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकलच्या नावाची परिक्षक म्हणून चर्चा रंगली होती. ‘नच बलिये’च्या नव्या पर्वासाठी अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि नृत्यदिग्दर्शक शामक दावर यांच्यासमोर परिक्षक पदासाठीचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. तर करण सिंग ग्रोवर या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करणार असल्याचे बोलले जात आहे. अद्याप या वृत्तांना कार्यक्रमाच्या आयोजकांकडून दुजोरा मिळाला नसला तरी कलाकारांबाबत रंगणाऱ्या चर्चेमुळे कार्यक्रमाचे वारे जोरदार पसरत असल्याचे दिसते.