बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर यांचं ‘शुभ मंगल सावधान’ होणार आहे. वाचून गोंधळलात ना? आयुष्यमानचं तर आधीच लग्न झालेलं असताना तो पुन्हा लग्न करतोय की काय असा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. पण, तसं काहीच नाहीये तर आगामी ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटामध्ये ही जोडी पाहायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘शुभमंगल सावधान’ या चित्रपटानंतर आता बॉलिवूडमध्येही अशाच शीर्षकाचा चित्रपट येतो आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हा मराठी चित्रपटाचा रिमेक असेल, तर असे नाहीये. हिट तमिळ विनोदी चित्रपट ‘कल्याण समयाल साधम’ याचा हा रिमेक आहे.

‘दम लगा के हैशा’ या चित्रपटात पती-पत्नीची भूमिका साकारणाऱ्या आयुषमान आणि भूमी यांची केमिस्ट्री आता पुन्हा एकदा ‘शुभ मंगल सावधान’मधून रुपेरी पडद्यावर पाहावयास मिळणार आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. आपले बिघडलेले नाते पूर्ववत करण्यासाठी पुन्हा एकत्र आलेल्या पती-पत्नीच्या भूमिकेत हे दोन्ही कलाकार दिसतील. आयुषमान आणि भूमी यांचा ‘शुभ मंगल सावधान’ हा एकत्र तिसरा चित्रपट असेल. ‘दम लगा के हैशा’नंतर या दोघांनी गेल्या वर्षी ‘मनमर्झिया’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, काही कारणांमुळे हा चित्रपट प्रसिद्धीच्या झोतात आला नाही.

तमिळ दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘शुभ मंगल सावधान’ या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय यांच्या ‘कलर यल्लो प्रॉडक्शन’अंतर्गत करण्यात येणार आहे. हा चित्रपट यावर्षी १ सप्टेंबरला प्रदर्शित होईल. तत्पूर्वी, परिणीती चोप्रा आणि आयुषमानचा ‘मेरी प्यारी बिंदू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. भूमी पेडणेकरही अक्षय कुमारसोबत काम करत असून त्यांचा ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ चित्रपट यावर्षी ११ ऑगस्टला प्रदर्शित होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानावर या चित्रपटाची कथा आधारित आहे.