आयुष्यात अनेक चढउतार बघितलेला अभिनेता संजय दत्त याच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीवर आधारित असलेला चित्रपट पुढील वर्षी नाताळमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर नायकाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट कधी येणार, याबद्दल अनेक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. ती अखेर संपुष्टात आली असून, त्याची तारीख निश्चित झाली आहे.
१९९३ च्या बॉम्बस्फोट खटल्यात शस्त्रास्त्र बाळगल्याच्या प्रकरणात संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. गेल्याच महिन्यात ती शिक्षा पूर्ण करून तो पुण्यातील येरवडा तुरुंगातून बाहेर आला. शिक्षेचा कालावधी संपल्यानंतर येरवडा तुरुंगातून बाहेर येताना संजय दत्तने राष्ट्रध्वजाला सलामी दिली होती. त्याचबरोबर त्याने मातृभूमीला वंदनही केले होते. हा क्षण त्याच्यावरील चित्रपटात दिसणार आहे, अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. त्याबद्दल अन्य माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही.