बॉलीवूड अभिनेता गोविंदाला चाहत्याच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी न्यायालयाने पाच लाखांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोविंदा संतोष राय या चाहत्याची माफी मागण्यास तयार झाला आहे. न्यायालयाने गोविंदाला यासाठी दोन अाठवड्यांचा अवधी दिला आहे. मात्र, संतोष राय यांना ही भरपाई मान्य नसून गोविंदाने प्रथम मला भेटावे, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या वर्षी ३० नोव्हेंबर रोजी अभिनेता गोविंदा याला चाहता संतोष रायची माफी मागण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.
२००८ मध्ये ‘मनी है तो हनी है’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गोविंदाने संतोष राय यांच्या कानशीलात लगावली होती. अभिनेता होण्याच्या इच्छेने मुंबईत आलेल्या संतोष यांनी ‘त्या’ घटनेनंतर आपलं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती. जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत कायदेशीर लढाई सुरुच ठेवण्याचा निर्धार राय यांनी व्यक्त केला होता.