बॉलिवूडची ‘फॅशन आयकॉन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनम कपूर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळेच जास्त चर्चेत आहे. प्रियकर आनंद आहुजासोबत सुट्टीचा आनंद घेऊन परतलेल्या सोनमने पुन्हा एकदा तिचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला खरा, पण इथे ती एका चित्रपटाचं चित्रीकरण अर्ध्यावरच सोडून मुंबईत परतली आहे. दिल्लीत सोनमच्या आगामी ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. पण, यातूनच सोनमने काढता पाय घेत थेट मुंबईची वाट धरली. तिने असं का केलं, हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना? चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांसोबत सोनमचा काहीच वाद झाला नसून ती मुंबईला येण्यांमागचं कारण वेगळच आहे.

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या काही भागाचं चित्रीकरण पूर्ण करण्यासाठी सोनमने मुंबईची वाट घरली आहे. या चित्रपटामधील आपल्या भागाचं चित्रीकरण सोनमने बरंच आधी पूर्ण केलं होतं. पण, अगदी शेवटच्या टप्प्यात कथानकात काही भाग जोडण्यात आला ज्यामुळे सोनमला पुन्हा एकदा चित्रीकरणासाठी यावं लागलं. राजकुमार हिरानी यांनी चित्रपटामध्ये काही बदल करण्यात आल्याविषयी सोनमला सांगितलं तेव्हा तिने तडक मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.

वाचा : माझा मुलगा कोणत्याही मुलीला भेटू शकतो- ऋषी कपूर

फक्त एक दिवसाच्या चित्रीकरणासाठीच ती मुंबईत आली असून, चित्रीकरण झाल्यानंतर सोनम पुन्हा दिल्लीला रवाना होणार असल्याचं वृत्त ‘एनडीटीव्ही’ने प्रसिद्ध केलं. संजय दत्तच्या जीवनावर साकारणाऱ्या चित्रपटाचं चित्रीकरण आता शेवटच्या टप्प्यात आलं आहे. अभिनेता रणबीर कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून, चित्रपटाद्वारे संजूबाबाच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रसंगांवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. सोनमही या चित्रपटामध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे भूमिकेचं गांभीर्य लक्षात घेता तिने व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत मुंबईला येण्याचा निर्णय घेतला.

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटासाठी सध्या सोनम बरीच उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. शिखा तल्सानिया, स्वरा भास्कर आणि करिना कपूर खानसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहेत. त्यामुळे ही ‘गर्ल गँग’ मिळून नेमका कोणता नजराणा सादर करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.