‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटांची नावं घेतल्यावर रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचीच नावं समोर येतात. या जोडीच्या अफलातून ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे बऱ्याच चर्चा रंगल्या. या चर्चा रंगण्याचं कारण त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीच होती असं म्हणून चालणार नाही. कारण, ऑफस्क्रीनही या दोघांमध्ये बरीच जवळीक पाहायला मिळाली होती. अगदी काल- पर्वापर्यंत त्यांच्या नात्यात सर्वकाही सुरळीत सुरु असताना अचानकच त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचं म्हटलं जात आहे.

एका प्रसिद्ध वृत्तपत्राला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणवीर- दीपिकाने कामाच्या वाढत्या व्यापामुळे आणि नात्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे इथेच थांबण्याचा निर्णय घेतला आहे. रणवीरने कोणा दुसऱ्या मुलीला डेट करण्यासही सुरुवात केल्याचं म्हटलं जातंय.
‘रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण, आता मात्र ते पुन्हा कधी रिलेशनशिपमध्ये येण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. रणवीरला या नात्यात आता पुढचं पाऊल उचलायचं होतं. पण, कामाच्या वाढत्या व्यापामुळे दीपिका लग्नासाठी तयार नव्हती.

वाचा : ‘लगान’मधील ‘ती’ सध्या काय करते?

दोघांच्या कुटुंबियांनीही त्यांच्या नात्यातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही’, अशी माहितीही सूत्रांकडून मिळाली आहे. तेव्हा सर्वांच्याच लाडक्या जोडीच्या नात्यात असा अनपेक्षित दुरावा आल्यामुळे सध्या विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. येत्या काळात हे दोन्ही कलाकार संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटामध्ये एकत्र झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून आता या सो कॉल्ड ब्रेकअपचा चित्रपटावर काही परिणाम होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.