पुनर्जन्मावर तुमचा विश्वास असो वा नसो. त्याला श्रद्धा किंवा अंधश्रद्धा असे काहीही म्हणा. पण पुनर्जन्म आहे असे मानण्याची खूप मोठी परंपरा आहे, हे तुम्ही नाकारू शकत नाही. चित्रपटातून ही परंपरा खूपच जपलीय. कधी एखाद्या पुरातन वास्तूला पहिल्यांदाच भेट देतानाही नायक वा नायिकेला वाटते की येथे आपण कधी तरी येऊन गेलोय. तर कधी गाण्याचे सूर कानावर पडतात आणि त्या दिशेने मन धावायला लागते, मेरे नैना सावन भादो. फिर भी मेरा मन प्यासा..फिर भी मेरा मन प्यासा. अगदी बरोबर ओळखलेत, 'मेहबूबा' चित्रपटातील हे गाणे आहे. आजही कुठे कानावर आले अथवा नुसती जरी आठवण आली तरी गिटार घेतलेला राजेश खन्ना अतिशय तन्मयतेने हे गातोय आणि त्याची प्रेमाची हाक ऐकून हेमा मालिनी त्या आवाजाच्या दिशेने धावताना दिसते. १९७६ सालचा हा चित्रपट आहे. मुशीर रियाझ निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन शक्ती सामंता यांचे आहे. तर आनंद बक्षीच्या गीताना राहुल देव बर्मनचे संगीत आहे. तब्बल चाळीस वर्षे होऊन गेल्यानंतरही या गाण्याचा गोडवा अगदी तसाच कायम आहे. बात पुरानी है. एक कहानी है. रात्रीच्या अंधारात एका दगडाला टेकून राजेश खन्ना गातोय आणि वारा असल्याने उडणाऱ्या पाल्यापाचोळ्यातून वाट काढत काढत हेमामालिनी त्या दिशेने धावतेय. गाण्यातील असोशी, वेदना अधिकच तीव्र होते तसा राजेशचा मुद्राभिनय अधिकच प्रभावी होतो. 'आराधना'पासूनच शक्ती सामंता व राजेश खन्ना ही दिग्दर्शक व अभिनेता ही जोडी छान जमलेली. त्यामुळेच या गाण्याच्या रुपेरी सादरीकरणात जास्तच खोली व उंची यांचा सूर सापडलेला. दो दिल टूट गये.. हमको मिले बिछडे. गाण्यातील व्याकुळता राजेश व हेमा दोघानाही प्रचंड अस्वस्थ करते. राजेश खन्ना हा किशोर कुमार व राहुल देव बर्मन यांचा एकदम सच्चा दोस्त म्हणून या त्रिमूर्तीची ओळख. किशोर कुमारचा आवाज ही पडद्यावर गाणे सादर करण्यासाठी देव आनंद व राजेश खन्ना यांच्याशी केवढा तरी एकरुप झालेला. त्यामुळे तर हे गाणे आणखीनच जवळचे वाटते. फिर भी मेरा मन प्यासा.. राजेश अधिकच तीव्रतेने भावना व्यक्त करतो. घामाघूम होत जातो. हेमा देखील त्याच्यापर्यंत पोहोचण्यास विलक्षण उत्सुक आहे. गाण्याचा मूड त्याच्या रुपेरी सादरीकरणात छान पकडलाय. राजेश खन्ना म्हणजे रोमान्स. राजेश खन्ना म्हणजे युवतींचे आकर्षण अथवा वेड. त्यामुळे त्याला हे गाणे अधिकच फिट बसते. आपल्यालाही वाटते की राजेश खन्ना व हेमा मालिनीच्या भेटीचा क्षण विलक्षण रोमांचक व्हावा. ऋतु आये, ऋतु जाए कैसे.. हेमा अधिकच उमाळ्याने धावते कारण हेच गाणे तिला पुनर्जन्माची आठवण देत असते. याच गाण्याभोवती 'मेहबूबा' गुंफलाय अथवा रंगवलाय. हे आपल्या लक्षात येताच आपण या गाण्याशी अधिकच जवळचे होतो. पूर्वीच्या चित्रपटात गाण्यांसह पटकथा पुढे जाई व ते दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, गायक व कलाकार या सगळ्यांचे एकत्रित वैशिष्ट्य मानले जाई. म्हणूनच तर पूर्वीच्या चित्रपटातील किती तरी गाणी कानावर पडली अथवा मुखडा आठवला तरी पडद्यावरचे त्या गाण्याचे सादरीकरण आपल्या डोळ्यासमोर हमखास येतेच. मेरे नैना सावन भादो. फिरभी मेरा मन प्यासा प्रेमाची आर्त हाक आपल्याला ऐकू येते व सेट लावून या गाण्याचे चित्रीकरण केले आहे ही गोष्ट दुर्लक्षित होते. ते काही का असेना गाणे आपल्याला उत्साहित करते हे जास्तच महत्त्वाचे. - दिलीप ठाकूर