लोणावळ्याहून चार दिवसांचं शूट संपवून मी मुंबईमध्ये पोहोचले. शूटिंगवरून आल्यावर थकवा असतोच. घरात पोहोचल्यावर लगेच हातातील सगळ्या बॅग्ज तशाच टाकल्या. म्हटलं पहिल्यांदा फ्रेश व्हावं, मग घर आवरायला घ्यावं. मी शॉवर घेण्यासाठी गेले. मस्तपैकी शॉवर चालू केला; पण शॉवरला पाणीच नाही.!! मुंबईच्या एवढ्या चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये पाणी आणि लाईट नाही असं होऊ शकत नाही. अचानक पाणी कसं गेलं; मला काहीच कळेना म्हणून मी वॉचमनला फोन लावला आणि विचारले, ‘भैय्या, घरमें पानी क्यो नही आ रहा?’ वॉचमन- ‘मॅडमजी, दो-चार दिनसे सुबह दस से शाम पाँच बजे तक पानी बंद कर दिया है..’. मी आश्चर्याने विचारले, ‘का?’. वॉचमन- ‘पानी का सार्टेज है ऐसा बोले सोसायटीवाले.’ वॉचमनने फोन ठेवून दिला. मला काही सुचेना. चार दिवस घर बंद होतं म्हणून पाणी भरूनसुद्धा ठेवलं नव्हतं. आता पाच कधी वाजणार या विचारात मी तशीच मटकन सोफ्यावर बसले. तेवढय़ात माझ्या कानावर माझ्या बाबांचे शब्द पडले- ‘पिंकी, ब्रश करताना नळ चालू ठेवू नको. पाणी वाया घालवू नको.’ मी अगदी लहान असल्यापासून माझ्या बाबांनी माझ्यावर असेच संस्कार केले. पाणी आणि वीज वाया घालवणे त्यांना अजिबात आवडत नसे. ते नेहमी म्हणत, की तिसरं महायुद्ध हे पाण्यावरून होणार. मी तेव्हा खूप हसण्यावारी घ्यायचे. पण आज माझ्या घरात पाच वाजेपर्यंत पाणी नसल्याचा प्रश्न हा माझ्यासाठी इतका गंभीर आहे की, खरेच, तिसरं महायुद्ध पाण्यावरून होईल याची मला खात्री पटली. बघा ना, म्हणजे सध्या रोज न्यूजपेपरमधील महाराष्ट्रातील दुष्काळाच्या बातम्या आणि पाण्यावरून चालणारे वाद हे आपल्याला सुन्न करतात. पाण्यावरून चालणारा वाद महाराष्ट्र- कर्नाटकमधील असो, जायकवाडीच्या पाण्यावरून चालणारा अहमदनगर- औरंगाबादच्या शेतकऱ्यांचा असो, किंवा अगदी नळावर होणारा बायकांचा वाद असो; या सगळ्या सिच्युएशनला आपण सीरिअसली घ्यायला हवं.! अगदी छोटय़ा छोटय़ा गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो आणि त्यातून मोठे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आपल्या रुटीन डेली लाईफमध्ये आपण अनेक ठिकाणी खूप पाणी खर्च करतो. कपडे धुताना, भांडी घासताना, ब्रश करताना पाण्याचे नळ सर्रास सुरु असतात. अगदी पुरुष मंडळीसुद्धा शेव्हिंग करताना नळ चालू ठेवतात. आज शहरात जवळपाय प्रत्येकाजवळ गाडी आहे, साहजिकच ती धुण्यासाठी पाण्याचा खूप वापर होतो. मला असं म्हणायचं नाही, की फक्त शहरातच पाणी केअरलेसली वापरलं जातंय. गावांमध्ये अगदी शेतीच्या कामातही गरजेपेक्षा जास्त पाणी पिकांना सोडलं जातं हे मी पाहिलंय. शहर, गाव असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात असंच केअरलेस अॅटिटय़ूडने वागलं जातं. आता आमच्या शूटिंग्जला पाणी पिण्यासाठी बॉटल्स वापरल्या जातात. काही जण नवीन बॉटल्समधील पाणी अर्धवट पिऊन उरलेली बॉटल तशीच फेकून देतात. अगदी आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांना आपण पाणी देतो तेव्हा त्यांनी अर्धाच ग्लास पाणी प्यायल्यावर आपण उरलेले पाणी फेकूनच देतो. तुम्ही म्हणाल, ही सगळ्यांना पाण्यावरून ब्लेम करतेय. पण तसा माझा अजिबात उद्देश नाही. आपण अगदी छोटय़ा-छोटय़ा सवयींमधून खूप पाणी वाचवू शकतो. भांडी धुताना, कपडे धुताना आपल्याला आवश्यक तेवढेच पाणी का घेत नाही? ब्रश किंवा दाढी करताना नळ का नाही बंद करत? वॉशरुमला गेल्यावर फ्लशसाठी पाच लिटर आणि दहा लिटर अशी दोन वेगळी प्रेस बटन्स असतानाही आपण नेहमी दोन्ही बटन्स एकदम प्रेस का करतो? का आपल्याला वाटतं, की पाच लिटर पाणी एक्स्ट्रा गेलं ड्रेनेजमध्ये तर जास्त फरक पडणार नाही. पण हा विचार का नाही करत, की एवढय़ा लोकांनी पाच लिटर इतक्यावेळेला केलेला फ्लश हा किती लिटर पाणी वाया घालवत असेल? गाडी धुण्यासाठी पाण्याचा खूप वापर केला जातो. मुंबईमध्ये लाखो गाडय़ा आहेत. रोज प्रत्येक गाडीला किमान पन्नास लिटर पाणी खर्च झाले तर फक्त मुंबईमध्ये किती लाख गॅलन पाणी खर्च होत असेल? का नाही आपण आपल्या गाडय़ांना कमी पाण्याचा वापर करत ओल्या फडक्याने गाडी पुसू शकत? का नाही आपण कार कव्हर्सचा गरज असताना वापर करत? आपण शेती ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनावर का नाही करत? घरी केलेल्या बागेतसुद्धा झाडांना अगदी त्यांच्या गरजेनुसार खूप जास्त पाणी का घालतो? त्यावर उपाय म्हणून आपण मिनरल वॉटरच्या किंवा कोणत्याही प्लास्टिक बॉटल्स पाण्याने भरून त्यांना एक छोटं होल करून कुंडय़ांमध्ये ठेवू शकतो. हे घरगुती ठिबक सिंचन एकदम इझी आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. अशा कल्पनांचा आपण का वापर करत नाही..? अनेक गोष्टींमधून आणि सवयींमधून आपण आपले नॅचरल रिसोर्सेस कन्झर्व्ह करू शकतो. मग आपण आपला केअरलेस अॅटिटय़ूड का सोडत नाही? हाच विचार येतो ना, की मी एकटय़ानेच करून काय फरक पडणार? पण हे असले विचार बदलले तर खरेच खूप फरक पडेल. तुम्हाला असं वाटत नाही का, की being the part of the universe आपली काही जबाबदारी आहे? आपण स्वत:ची लाईफस्टाईल बदलायला हवी? म्हणजे बघा- पैसे कमाविण्यासाठी किंवा लॅव्हिश लाईफस्टाईल जगण्यासाठी आपण आटापिटा करतोच ना? मग पाणी वाचविण्यासाठी आपण पुढाकार का घेत नाही? आता नोव्हेंबरमध्ये पाण्याची अवस्था एवढी गंभीर असेल तर ऐन उन्हाळ्यात काय होईल? सो प्लीज सेव्ह वॉटर अॅण्ड सेव्ह अवरसेल्व्हज! - स्मिता गोंदकर