भारतीय चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून विविध विषय समर्पकपणे हाताळले जात आहेत. पण, ते विषय हाताळताना, काही बाबतीत घेतलं जाणारं स्वातंत्र्य आणि कलाकारांच्या कलेवर सेन्सॉरची कात्री चालतेच. बऱ्याच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनी या बाबतीच त्यांची मतं व्यक्त केली. किंबहुना त्यापैकी काहींना सेन्सॉरची भूमिका पटतही नाहीये. याविषयीचं मत व्यक्त करत 'राग देश' या चित्रपटाचा दिग्दर्शक तिग्मांशू धुलियानेही मत मांडलं आहे. १९४२ ते ४५ दरम्यानच्या काळातील कथानकावर 'राग देश' हा त्याचा आगामी चित्रपट आधारलेला आहे. 'न्यूज १८'ला दिलेल्या मुलाखतीत तिग्मांशुने या चित्रपटासंबंधीची काही माहिती दिली. तिग्मांशू धुलिया, मोहित मारवा आणि कुणाल कपूर यांनी यावेळी चित्रपटाविषयी बरीच चर्चा केली. 'त्या काळच्या लोकांमध्ये हल्लीच्या दिवसांपेक्षा जास्त प्रामाणिकपणा होता', असं मत या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता कुणाल कपूर म्हणाला. त्यादरम्यानच चित्रपट दिग्दर्शक म्हणून सेन्सॉरच्या भूमिकेविषयी सांगताना तिग्मांशू म्हणाला, 'सेन्सॉरची एकंदर भूमिका आणि त्याविषयीचं माझं जे मत आहे त्याबदद्दल मी लढा देऊ शकतो, तो एक वेगळा विषय आहे. पण, इथे मुख्य मुद्दा आहे तो म्हणजे काही मोठ्या निर्मात्या- दिग्दर्शकांकडे सेन्सॉरचं झुकतं माप असतं. अर्थात मी त्यांची नावं घेणार नाही. पण, अशी ३- ४ निर्मिती संस्थांची नावं आहेत ज्यांच्या चित्रपटांना 'यू/ए' प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. ज्यामध्ये किस, स्मूच यांसारखी दृ्श्य आहेत. पण, त्याच ठिकाणी ज्या चित्रपट दिग्दर्शकांच्या नावाला तितकंसं वजन नाही त्यांच्या बाबतीत मात्र सेन्सॉरची भूमिका खटकण्याजोगी आहे.' तिग्मांशुने या मुलाखतीदरम्यान एका अर्थी सेन्सॉरच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे असंच म्हणावं लागेल. बड्या नावांकडे सेन्सॉरचं झुकतं माप पाहता, यावर काय उपाय असू शकतो असं विचारलं असता, 'चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शन करणं थांबवलं पाहिजे', असं उपरोधिक उत्तर त्याने दिलं. सेन्सॉरची भूमिका आणि चित्रपटांमध्ये वाढता हस्तक्षेप सध्या अनेकांनाच खटकत आहे ही बाब आता प्रकर्षाने जाणवू लागलीये. वाचा : रंजनासारखी अभिनेत्री होणं नाही- अशोक सराफ सिंगापूर आणि बर्मामध्ये युद्धबंदी असणाऱ्या ब्रिटिश- इंडियन आर्मीमध्ये कर्नल प्रेम सेहगल, कर्नल गुरबक्श सिंग ढिल्लों आणि मेजर जनरल शाह नवाझ खान या तीन सैन्यदल अधिकाऱ्यांभोवती 'राग देश'चं कथानक फिरणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता कुणाल कपूर, मोहित मारवा आणि अमित सध प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस, त्यांनी उभा केलेली आझाद हिंद सेना, देशाचा स्वातंत्र्य लढा या सर्व मुद्द्यांवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात येणार असून, २८ जुलैला हा 'राग देश' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.