सैफ अली खानला दिलेला पद्मश्री पुरस्कार भारत सरकार परत घेण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल २०१० मध्ये सैफला ‘पद्मश्री’ देण्यात आला होता.
अभिनेता सैफ अली खानने फेब्रुवारी २०१२ रोजी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये किरकोळ कारणावरुन अनिवासी भारतीयाला मारहाण केली होती. या प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने सैफवर आरोप निश्चित केले आहे. या प्रकरणाशिवाय इतर काही गुन्ह्यांमध्ये सैफचे नाव आहे. गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीला सदर पुरस्कार कसा दिला जाऊ शकतो असा प्रश्न उभा करत सुभाष अग्रवाल यांनी आरटीआयअंतर्गत याचिका दाखल केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने २० ऑगस्ट २०१४ मध्ये मुंबई पोलिसांना पत्र पाठवून सैफ प्रकरणात अहवाल मागवला होता. मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप अहवाल सादर केला नाही. याव्यतिरीक्त पद्म पुरस्कार मिळालेल्या उद्योगपती अरुण फिरोदिया यांच्या नावाबद्दलही आक्षेप घेण्यात आला आहे. गृह मंत्रालयाने फिरोदियांबाबतचाही अहवाल मागवला आहे.