विनोदवीर कपिल शर्मा हे नाव गेल्या काही वर्षांमध्ये चांगलच नावारुपास आल्याचं पाहायला मिळालं. एका टेलिव्हिजन रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवणाऱ्या कपिलने प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. त्यासोबतच त्याने अनोख्या विनोदी शैलीच्या आधारे स्वत:चा वेगळा विनोदी कार्यक्रमही सुरु केला होता. शुन्यातून सुरु झालेला त्याचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असला तरीही सध्याच्या घडीला त्याच्या करिअरमध्ये बरीट संकटं येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

विनोदी कार्यक्रमांच्या या बेताज बादशहाची प्रेक्षकांवर असलेली पकड आता मात्र काहीशी सैल पडताना दिसत आहे. अर्थात त्याला टक्कर देण्यासाठी इतरही विनोदवीर तयार झाले आहेत ही बाब तितकीच महत्त्वाची. स्पर्धात्मक वातावरणाला कपिलने कधीच नाकारलं नाही. पण, एका वळणावर त्याच्या कार्यक्रमातील सहकलाकारांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली आणि या विनोदवीराच्या करिअरमध्ये एकामागोमाग एक संकटं येण्यास सुरुवात झाली.

काही महिन्यांपूर्वीच कपिल शर्मा आणि त्याची प्रेयसी विवाहबंधनात अडकणार असल्याच्याही चर्चा होत्या. पण, त्याची तब्येत ठीक नसल्यामुळे सर्व गोष्टी मागे पडताना दिसत आहेत. इतकच नव्हे तर काही दिवसांपासून कपिल तणावग्रस्त परिस्थितीत असून त्यामुळे वारंवार त्याची तब्येत बिघडत असल्याचंही म्हटलं जात आहे.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

कार्यक्रमाच्या एका टप्प्यावर काही कलाकारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवणं, चित्रीकरण न करताच निघून जाणं आणि टिआरपीच्या यादीतही कार्यक्रमाची एकाएकी घसरण होणं हे सर्व मुद्दे कपिलच्या कारकिर्दीत अडथळे निर्माण करत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रिअॅलिटी शो आणि टेलिव्हिजन मालिकांच्या वाढत्या प्रस्थाचा फटका द कपिल शर्मा शोला बसत आहे. त्यातही त्याच्या कार्यक्रमात नव्या- जुन्या कलाकारांच इनकमिंग आणि आऊटगोइंग सुर असल्यामुळेही कार्यक्रमाचं स्वरुप सतत बदलत आहे. त्यामुळे प्रेक्षकही हळहळू कपिल शर्मा शोकडे पाठ फिरवत आहेत. तेव्हा आता प्रेक्षकांच्या मनात आपलं आणि आपल्या कार्यक्रमाचं स्थान कायम ठेवण्यासाठी कपिल काय प्रयत्न करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.