छोट्या पडद्यावरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेवर गंडांतर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मालिकेमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप घेत मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'रात्रीस खेळ चाले' मालिकेत ज्याप्रकारे कोकणातील भूताखेतांच्या कथांचे चित्रण करण्यात आले आहे त्यामुळे लोकांत कोकणाबद्दलचे गैरसमज वाढीस लागतील, असा आरोप करण्यात येत आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांना समुद्रकिनारी नारळी-पोफळीच्या बागांमध्ये असणाऱ्या वाड्यात रहायचे असते. त्यामुळे वाडे आणि कोकणातील पारंपरिक पद्धतीच्या घरांमध्ये राहण्यास पर्यटकांकडून प्राधान्य दिले जाते. मात्र, 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत दाखविण्यात येत असलेल्या वाड्यातील घडामोडींमुळे पर्यटकांमध्ये याबद्दल भिती निर्माण होऊ शकते, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. माजी खासदार निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांनीही या मालिकेमुळे कोकणातील पर्यटनावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे सांगत मालिकेचे चित्रीकरण बंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आम्ही येत्या काळात कोकणाची सकारात्मक बाजू दाखवू, असे आश्वासन निर्मात्यांकडून देण्यात आल्यानंतर राणे यांच्या कार्यकर्त्यांनी माघार घेतली. दरम्यान, भास-आभासांचा खेळ असणाऱ्या या मालिकेतून कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा आमचा हेतू नाही, असे 'झी मराठी'चे बिझनेस हेड दीपक राजाध्यक्ष यांनी स्पष्ट केले.