बॉलीवूड नंबर वन स्टार सलमान खानचा बहुचर्चित ‘दबंग २’ म्हणजे चुलबूल पांडेच्या स्टाईलचा दुसरा भाग आहे. ‘लार्जर दॅन लाईफ’ नायक असल्यामुळे अर्थातच सलमान स्टाईल अ‍ॅक्शनचा धमाका आहेच. परंतु ‘फेविकोल से’ आणि ‘नैना.’ हे गाणे सोडले तर गाणी, रोमान्स, विनोद यामध्ये चुलबूल पांडेचा दुसरा भाग फिका पडतो. पहिल्या चित्रपटापेक्षा या सीक्वेलमध्ये सोनाक्षी सिन्हा अधिक सुंदर दिसते. त्यामुळे सलमान खानच्या चाहत्यांना चित्रपट थोडा अधिक रंजक वाटेलही. चित्रपटात अस्थानी येणारी गाणी, मधे मधे आपल्या हाताखालच्या सहकारी पोलिसांबरोबर केलेले पानचट विनोद, सलमानची हसण्याची स्टाईल आणि दिग्दर्शन कौशल्याविनाच केवळ अप्रतिम मारामारी पाहून फक्त सलमान खानचे निस्सीम चाहतेच खुश होतील. हा तद्दन सलमानपट आहे.
चित्रपटाला सुरुवात होते ती शाळकरी मुलाच्या अपहरणाच्या घटनेने. त्या शाळकरी मुलाला चुलबूल पांडे आपल्या व्यवच्छेदक आक्रमण शैलीने सोडवितो. दबंग हे चित्रपटाचे शीर्षक सिद्ध करण्यासाठी चुलबूल पांडे गुंडांच्या लोखंडी-सिमेंट क्राँकिटचा भक्कम अड्डा जीपसह येऊन उद्ध्वस्त करतो अशी सलमान पहिलीच ‘दबंग’ एण्ट्री आहे. त्यामुळे अर्थातच सलमानच्या चाहत्यांकडून शिट्टय़ा-टाळ्यांचा कडकडाट न झाला तरच नवल.
या भागामध्ये छेदी सिंगला नेस्तनाबूत केल्यानंतर चुलबूल पांडेची बदली कानपूर चौकीत थोडय़ा मोठय़ा गावात केली जाते आणि बच्चा भैय्या (प्रकाश राज) या गावातील राजकारणी-गुंड-माफिया-हुकूमशहाला संपविण्याचा विडा सलमान खान उचलतो. सलमानने बांधलेला पट्टा आपोआप नाचतो आणि त्याबरोबर सलमानही नाचतो, ते पाहून बाकीचे पोलीस, नागरीक, तरुण, सलमानचाहते सगळेच नाचू लागतात. ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा जपण्यासाठी चित्रपटातील जवळपास प्रत्येक गाण्यात आणि प्रत्येक दृश्यात प्रचंड मोठा मॉब सलमानची दबंगगिरी बघण्यासाठी उत्सुक आहे असे दाखविले आहे.
या भागात चुलबूल पांडेचे रज्जो (सोनाक्षी) हिच्याशी लग्न झालेय. आता ते मूलाला जन्म देणार आहेत. वडील विनोद खन्ना आणि हाफ मॅड भाऊ मख्खीचंद असे चुलबूल पांडेचे कुटूंब आहे. चित्रपटाचा भडकपणा अधिक भडक दाखविण्यासाठी चित्रविचित्र रंगांचा भडीमार हेही या चित्रपटाचे वैशिष्टय़ आहे. अंगावर येणारी रंगसंगती साधून चित्रपटाचा ‘दबंग’ परिणाम प्रेक्षकावर व्हावा हा दिग्दर्शकाचा हेतू आहे की काय असे वाटावे इतके भडक रंग पडदाभर दिसत राहतात.
खलनायक बच्चा भैय्याचा भाऊ गेंदा याची मान मोडून त्याला यमसदनास पाठविणारा चुलबूल पांडे लग्नमंडपात गेंदाचा मृतदेह सोडून निघून जातो आणि जाताना लग्नाच्या वऱ्हाडाला शुभेच्छाही देतो हे भयंकर वाटते. चुलबूल-रज्जो यांचा घरातला रोमान्स दाखविताना एकदम गाणे येते आणि रसभंग होतो. असे अनेकदा होते त्यामुळे प्रेक्षकाचा रसभंग होतो. परंतु, चित्रपटाचा हेतूच धमाल मनोरंजन करणे असल्यामुळे मारामारीचा कंटाळा आला की गाणे आणि गाण्याचा कंटाळा आला की तोंडी लावायला पोलिसांचे पाणचट विनोद असा मामला संबंध चित्रपटभर आहे. आता तुझी काही खैर नाही म्हणत बच्चा भैय्या चुलबूल पांडेला धडा शिकविण्याची धमकी देतो आणि प्रत्यक्षात मात्र त्यासाठी काहीच व्यूहरचना, कट रचत नाही हे दिग्दर्शकाचे कल्पनादारिद्र्य आहे. वडील विनोद खन्ना आणि पुत्र सलमान यांच्यातील संवाद-विनोद अतिशय कंटाळवाणे, उगीचच घुसडल्यासारखे वाटतात. चित्रपटाचा पहिला भाग खूपच लांबतो. अर्थात गाणी-मारामारी-रोमान्स-विनोद हा फॉम्र्युला सतत दाखवायचा हा एकच इरादा दिग्दर्शकाने ठरविल्यामुळे तोच तोपणा सिनेमात येतो. ‘फेविकोल से’ या आयटम साँगमार्फत करिनाने आपण कपूर घराण्याची परंपरा बहिण करिष्मासारखीच पडद्यावर दाखविण्यात यशस्वी आहोत असा समज करून घेतलेला दिसतो. चुलबूल पांडे अपहृत मुलाची सुटका केल्यानंतर त्याच्या वडिलांकडून १० लाख रुपये उकळतो हे दाखवून दिग्दर्शकाला कोणता आदर्श प्रेक्षकांसमोर ठेवायचा आहे. त्याचबरोबर ‘फेविकोल से’ गाण्याचे बोल इतके अश्लील आहेत की भारतीय स्त्रीची पडद्यावरील प्रतिमा आणखी डागाळून टाकण्याचा जणू विडाच उचललेला दिसतो.
सबकुछ सलमान असल्यामुळे सोनाक्षीसह अन्य कलावंतांना अभिनय दाखविण्यासाठी वावच नाही. तद्दन सलमानपट म्हणून चित्रपट पाहिला जात असल्यामुळे ‘सिनेमा’ म्हणून त्यात काहीच नाही असेच म्हणावे लागेल.
निर्माता-दिग्दर्शक – अरबाज खान
लेखक – दिलीप शुक्ला
संगीत – साजिद-वाजिद
कलाकार – सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, प्रकाश राज, अरबाज खान, विनोद खन्ना, दीपक दोब्रियाल व अन्य.