‘बाहुबली’ सिनेमामुळे खरंतर प्रभास आणि अनुष्का शेट्टी हे दोन दाक्षिणात्य कलाकार संपूर्ण देशाला कळले. या सिनेमानंतर अनुष्का शेट्टी व प्रभास या दोघांच्या चाहत्यांची संख्या कैकपटींनी वाढली. प्रभास आणि अनुष्का यांचे जुने सिनेमेही त्यांचे चाहते बघायला लागले. ज्यांना तमिळ, तेलगु भाषा येत नाहीत ते चाहतेही या दोघांसाठी त्यांचे जुने सिनेमे वारंवार पाहत आहेत.

‘बाहुबली २’ सिनेमाने धमाकेदार यश मिळवलं. हा सिनेमा प्रदर्शित होऊन अजून महिनाही उलटला नाही. पण अद्यापही या सिनेमाची झिंग चाहत्यांच्या मनातून उतरलेली नाही. याचमुळे या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आत्तापर्यंत १५०० कोटींहून अधिक कमाई केली असून हा आकडा दिवसागणिक वाढतोय. कदाचित म्हणूनच सिनेमासंदर्भात ज्या कोणत्या गोष्टी समजतील त्या जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. त्यामुळेच या दोघांच्या अफेअरची बातमी येताच, चाहत्यांनाही ही बातमी खरी ठरावी, असे वाटतेय. पण तुम्हाला माहिती आहे का की प्रभासमुळेच अनुष्काने तिचं लग्न दोन वर्षे पुढे ढकललं होतं.

अनुष्का दोन वर्षांपूर्वीच लग्न करणार होती. पण प्रभासने तिला इतक्यात लग्न न करण्याचा सल्ला दिला. ‘बाहुबली’ सिनेमाच्या दोन्ही भागांसाठी प्रभासने आपल्या आयुष्याची पाच वर्षे दिली होती. तशीच मेहनत अनुष्कानेही केली होती. पण ‘बाहुबली २’ हा सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अनुष्का लग्न करण्याचा विचार करतेय, असे त्याला कळले तेव्हा त्याने तिला लग्न न करण्याचा सल्ला दिला. अनुष्काचे लक्ष ‘बाहुबली २’ वरून जराही विचलीत होता कामा नये, असे प्रभासला वाटत होते. कारण या सिनेमासाठी त्याने व अनुष्काने खूप मेहनत केली होती. आता प्रभासने अनुष्काला काही सांगितले आणि तिने ते ऐकले नाही असं तर होऊच शकत नाही ना… अखेर तिने प्रभासचा सल्ला मानला आणि स्वतःचे लग्न दोन वर्षे पुढे ढकलले. पण आता ‘बाहुबली २’ सिनेमा प्रदर्शितही झाला आणि सुपरहिटही झाला. आता खरंच अनुष्का लग्न करणार का? केलं तर कोणाशी करणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात उपस्थित झाले आहेत.