बिग बॉस १० या रिअॅलिटी शोसाठी हा आठवडा धक्कादायक ठरला आहे. शोमध्ये वाइल्ड कार्ड एण्ट्री झाल्यानंतर प्रियांका आणि मनवीर जखमी झाले. न्यायालयाच्या सुनावणीमुळे स्वामी ओमजींना घर सोडावे लागले आणि आता मनोज पंजाबी यालाही गडबडीत घर सोडावे लागले आहे. पण, मनूला घर सोडावे लागण्यामागचे कारण खूपच दु:खद आहे. इंडियन एक्स्प्रेसला या शोच्या सेटवरील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनूने काल रात्रीच सलमानचा शो सोडला आहे. मनूच्या आईचे निधन झाल्याने त्याला घर सोडावे लागले.

इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनूला सदर दु:खद बातमी न देता बिग बॉसचे घर सोडण्याचे आदेश देण्यात आले. बिग बॉस १०मधील स्पर्धकांमध्ये मनू हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता. शनिवारच्या एपिसोडमध्ये त्याची प्रेयसी प्रियांकाही येऊन गेली होती. मनूची बिग बॉसमधील सहस्पर्धक मोनालिसा हिच्याशी जवळीक वाढत होती. त्यामुळे त्याचेच स्पष्टीकरण घेण्यासाठी प्रियांका सलमानच्या शोमध्ये गेली होती. बिग बॉसचा दहावा सिझन ऑक्टोबरमध्ये सुरु झाल्यापासून मनू, मनवीर आणि मोना यांच्यात चांगलीच मैत्री जमली होती. कट रचण्यापासून ते बौद्धिक खेळी खेळण्यापर्यंत मनूचा सहभाग होता. या सिझनच्या अंतिम फेरीतील प्रबळ दावेदारांमध्ये मनूचे नाव यायचे.

बिग बॉसच्या गेल्या सिझनमध्ये मॉडेल, अभिनेता केथ सिक्वेरा यालाही त्याच्या लहान भावाचे निधन झाल्यामुळे अर्ध्यातूनच शो सोडावा लागला होता. त्यानंतर आपल्या कुटुंबासह काही आठवडे घालवल्यानंतर तो पुन्हा शोमध्ये परतला होता. यात त्याची प्रेयसी रोशेलो राव ही देखील सहस्पर्धक होती. मात्र, मनू पुन्हा या शोमध्ये परत येईल की नाही हा त्याचा वैयक्तीक निर्णय असणार आहे. पण आता त्याला त्याच्या कुटुंबासोबत असण्याची जास्त गरज आहे.