‘सोपानाची आई बहिणाबाई' आता शाळेच्या प्रांगणात यंदा ऑस्करच्या स्पर्धेत उतरलेला ‘कोर्ट’ आणि ऐन दिवाळीत बिग बजेट हिंदी सिनेमांच्या स्पर्धेत उतरून सुपरहिट ठरलेल्या ‘कटय़ार काळजात घुसली’ तसेच ‘मुंबई-पुणे-मुंबई- २’ अशा चित्रपटांमुळे मराठी सिनेमाला चांगले दिवस आल्याची चर्चा सुरू झाली असली तरी नावीन्यपूर्ण प्रयोग आणि सामाजिक विषय हाताळणाऱ्या मराठी चित्रपटांसाठी रुपेरी पडद्याचा मार्ग अजूनही काटेरी ठरत आहे. आपल्या काव्यप्रतिभेने मराठी साहित्यात अढळस्थान मिळवलेल्या थोर कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या चरित्रावर आधारित ‘सोपानाची आई बहिणाबाई’ हा चित्रपट वितरणाअभावी सिनेमागृहात झळकू शकलेला नाही. आर्थिक कोंडीमुळे वितरण करणे कठीण झाल्याने चित्रपटाच्या निर्मात्यांनी आता शाळाशाळांतून हा चित्रपट दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी चित्रपटांना अलीकडच्या काळात चांगला प्रेक्षक मिळत आहे. वेगळय़ा विषयाचे, नावीन्यपूर्ण मांडणी असलेल्या सिनेमांपासून तद्दन व्यावसायिक सिनेमांपर्यंतच्या प्रत्येक चांगल्या चित्रपटाला प्रेक्षकांची गर्दी होत आहे. अलीकडच्या काळात आलेले काही सामाजिक विषय असलेले चित्रपटही त्यामुळे सिनेमागृहांत गर्दी खेचणारे ठरले. मात्र, चित्रपट बनवतानाच त्याच्या वितरणाचे, सिनेमागृहांतील खेळांचे, दूरचित्रवाण्यांच्या प्रसारण हक्काचे गणित जुळवण्याचे तंत्र आत्मसात करणे अनेक निर्मात्यांना अद्याप जमलेले नाही. त्यामुळे अनेक चित्रपट डब्यातच पडून राहतात. आपल्या सहजसोप्या पण प्रचंड अर्थ सामावलेल्या कविता रचणाऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनावर आधारित ‘सोपानाची आई बहिणाबाई’ या चित्रपटावरही तीच वेळ ओढवली आहे. ठाण्यातील अॅड. वंदना जाधव यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यात त्यांचे जवळपास एक कोटी रुपये खर्च झाले आहेत. आता चित्रपट स्वत: वितरित करण्याएवढी आर्थिक कुवत त्यांच्यापाशी नाही. गल्लाभरू मनोरंजनमूल्याचा अभाव असल्याच्या कारणावरून रुपेरी पडद्यावरील व्यवस्थेकडून नाकारला जात असून दूरचित्रवाणी वाहिन्यांनीही हा सिनेमा दाखविण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. समीक्षकांकडून गौरव ‘सोपानाची आई बहिणाबाई’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन कय्युम काझी यांचे आहे. किशोर कदम, सुहास पळशीकर, अजित भागत आदी कलावंतांच्या या सिनेमात भूमिका आहेत. बहिणाबाईंची भूमिका विभावरी देशपांडे यांनी साकारली आहे. जळगाव जिल्ह्य़ातील असोदा या गावी चित्रपटाचे चित्रीकरण झाले. सांगली, नाशिक तसेच नुकत्याच पार पडलेल्या अंबरनाथ चित्रपट महोत्सवात परीक्षकांनी विशेष पुरस्कार देऊन या सिनेमाचा गौरव केला आहे. मराठी काव्यप्रतिभेचे उत्तुंग लेणे असलेल्या बहिणाबाईंच्या चरित्रावरील सिनेमा केवळ आर्थिक कारणामुळे प्रदर्शित करता येऊ नये हे खरेतर दुदैर्वी आहे. मात्र आमचा नाईलाज आहे. आधीच चित्रपट निर्मितीसाठी जवळपास एक कोटी रूपये खर्च झाले आहेत. आता पुन्हा सिनेमागृहांच्या खेळांसाठी लाखो रूपये उभे करणे आम्हाला शक्य नाही. किमान केवळ सिनेमांना वाहिलेल्या व्यावसायिक उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्यांनी तरी हा सिनेमा दाखवावा, अशी अपेक्षा होती. मात्र तिथेही निराशाच पदरी पडली. त्यामुळे आता शासनाच्या परवानगीने शाळांमधून हा सामाजिक चित्रपट दाखविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अॅड. वंदना जाधव, चित्रपट निर्माती