dilip thakurअमिताभने ‘कौन बनेगा करोडपती’ (२०००) पासून मोठ्या पडद्यावरच्या स्टारने छोट्या पडद्यावर येण्याला विश्वास, लोकप्रियता आणि पैसा मिळवून दिला, तरी तत्पूर्वीही काही मोठे तारे एखाद्या कार्यक्रमात पाहुणा म्हणून छोट्या पडद्यावर येत… आमिर खान असाच एकदा १९९३ साली आला होता. माहित्येय? उपग्रह वाहिन्यांचे नुकतेच कुठे आगमन झाले होते. चित्रपट गीत-संगीताच्या कार्यक्रमाना त्यात विशेष ‘स्कोप’ होता. एके काळच्या दूरदर्शनवरच्या ‘छायागीत’मधील नवीन-जुन्या गाण्यांचे दर्शन प्रचंड लोकप्रिय झाले असल्याने तसा कार्यक्रम आयोजिला जाणे स्वाभाविक होते. तो होता ‘सुपरहिट मुकाबला’ विशेष म्हणजे तात्कालिक यशस्वी गाणी त्यात दाखवली जाताना प्रेक्षकांकडून सर्वाधिक आवडते गाणे कोणते हे एका पोस्टकार्डवर मागितले जाई आणि कार्यक्रमाच्या अखेरीला पाहुणा त्यातील एक पत्र काढून विजेता ठरवे. वर्षा उसगांवकर अतिशय उत्स्फूर्त आणि खेळकरपणे याचे सादरीकरण करे. त्यात एकदा चक्क आमिर खान आला. ‘कयामत से कयामत तक’पासूनची कारकिर्द एव्हाना रंगात आली होती. विशेषत: ‘दिल’च्या यशाने तो युवा पिढीत प्रचंड लोकप्रिय होता. तो तेव्हापासूनच खूपच मोजक्या चित्रपटातून भूमिका साकारणारा. म्हणूनच तर तो असा छोट्या पडद्यावर दिसणे विशेष कुतुहल आणि कौतुकाचे! वर्षा तर हे चित्रीकरण झाल्यापासून ते प्रक्षेपित होईपर्यन्त विशेषच रोमांचित. अमिरचे हे येणे त्या दिवसाच्या वृत्तपत्रातही बातमी स्वरुपात आल्याने प्रेक्षकसंख्या वाढली. यात आश्चर्य ते काय? (तोपर्यंन्त टीआरपी हा शब्द वापरात आला नव्हता.) … ‘सत्यमेव जयते’साठी आमिर छोट्या पडद्यावर आला तोपर्यंन्त त्याच्यात आणि या माध्यमात खूपच फरक झाला होता.