हिंदी चित्रपटसृष्टी आणि शब्दमैफिलींच्या दुनियेमध्ये गीतकार, कवी, लेखक, दिग्दर्शक अशा विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांसमोर आलेले 'गुलजार' यांचा आज वाढदिवस. वयाची मर्यादा किंवा त्यानिमित्ताने येणारी बंधनं त्यांच्या शब्दसामर्थ्यापलीकडे कधी आलीच नाहीत आणि येणारही नाहीत. सोशल मीडियावरुन गुलजार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत असून, #Gulzar हा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला आहे. 'संपूर्ण सिंग कालरा' हे त्यांचं पूर्ण नाव. या नावाने त्यांची ख्याती नसली तरीही गुलजार या शब्दाच्या नुसत्या उल्लेखानेही अनेकांना सुखद दिलासा मिळतो. 'बंदिनी'या चित्रपटाच्या गीतांद्वारे एस. डी. बर्मन यांच्या संगीताची जोड घेत शब्दांशी एखाद्या लहान मुलाप्रमाणे खेळणाऱ्या गुलजार यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. आर. डी. बर्मन, सलील चौधरी, विशाल भारद्वाज, ए. आर. रेहमान असे बरेच संगीतकार बदलत गेले. पण, गुलजार आणि त्यांचे शब्द मात्र अनेक दशकं रसिकांची शाब्दिक तहान भागवत आहेत असंच म्हणावं लागेल. कुसुमाग्रजांच्या कविता गुलजार यांनी हिंदमध्ये अनुवादित केल्यामुळे त्या सर्वांपर्यंत पोहोचल्या. केवळ यावरच न थांबता विंदा करंदीकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, ग्रेस यांच्यासह नव्या पिढीतील सौमित्र (अभिनेता किशोर कदम) यांच्या कविताही त्यांनी हिंदीमध्ये अनुवादित केल्या. 'सौमित्र' हा अभिनेता असल्याने त्याच्या कवितांमध्ये नाट्यमयता आहे', असे मत खुद्द गुलजार यांनी एका कार्यक्रमादरम्यान मांडलं होतं. त्यामुळे प्रत्येक कलाकाराच्या कलेची दाद देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीसुद्धा गुलजार नेहमीच पुढे आहेत. वाचा : गुलजार म्हणतात, भय इथले संपत नाही ! 'कवितेच्या माध्यमातून मी माझे अनुभव मांडतो. पण, चित्रपट गीतांच्या बाबतीत तसं नाहीये. चित्रपटाच्या संहितेच्या अनुषंगानेच गीत लिहावं लागतं. त्यामुळे कवितेच्या माध्यमातून मी स्वतःला अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त करतो' असं गुलजार यांचं मत आहे. या वक्तव्यामुळे त्यांना कवी आणि गीतकारापैकी त्यांच्यातील कवी नेहमीच जास्त महत्त्वाचा वाटत असल्याचं स्पष्ट होतं. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गुलजार यांना आजवर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. त्यामुळेच लेखणीच्या सामर्थ्याचं उत्तम उदाहरण देण्यासाठी नेहमीच गुलजार यांचं नाव पुढे केलं जातं.