ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांचा आज ७३ वा वाढदिवस. बानो यांनी आतापर्यंत १९६१ ते १९८८ पर्यंत अनेक सिनेमांत काम केले. ७० आणि ८० च्या दशकात त्या बॉलिवूड दिवा म्हणून ओळखल्या जायच्या. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. शम्मी कपूर यांच्यासोबत केलेला 'जंगली' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. या सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या या कारकिर्दीत त्यांनी अनेक हिट सिनेमे दिले. पण त्यांचे आयुष्य फक्त सिनेमांपुरतेच मर्यादित नव्हते. दिलीप कुमार यांच्यासोबतचे सायरा बानो यांचे लग्नही चर्चेचा विषय ठरला होता. हिंदी सिनेसृष्टीचे 'किंग ऑफ ट्रेजेडी' दिलीप कुमार उर्फ युसूफ खान आणि सायरा बानो यांचे प्रेम कोणत्याही परिकथेपेक्षा कमी नाही. वयाच्या १२ व्या वर्षीच सायरा या दिलीप यांच्या प्रेमात पडल्या होत्या. याविषयीच एका मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, 'मी माझ्या स्वप्नांना योग्य दिशा दिली आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या स्वप्नांवर पूर्ण विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला.' सायरा बानो यांनी आयुष्यातील प्रत्येक प्रसंगामध्ये दिलीप कुमार यांती साथ दिली आहे. आता उतार वयातही त्या दिलीपजींची फार काळजी घेतात. त्यांच्या याच स्वभावामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना 'सती सावित्री' अशी उपमा देण्यात आली होती. या उपमेवर भाष्य करताना त्या म्हणाल्या की, 'जर तुमचा नवरा देशाचा 'कोहिनूर' असेल तर त्याच्या बायकोने 'सती सावित्री' का असू नये? असा प्रश्न त्यांनी विचारला. प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्यावर प्रेम करते आणि त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. मी त्यांची काळजी घेते असं मी कधीच म्हणणार नाही. कारण माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यांच्यासाठी मी काहीही करु शकते.' सायरा यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत १९६६ मध्ये लग्न केले. लग्नाच्यावेळी सायरा यांचे वय अवघे २२ वर्षे होते तर दिलीप यांचे वय ४४ वर्षे होते. त्यामुळेच यांचे लग्न फार काळ टिकणार नाही अशीच भावना तेव्हा अनेकांच्या मनात होती. पण वयातल्या या फरकानेच आमचे नाते अधिक मजबूत ठेवले असे सायरा बानो ठामपणे सांगत आल्या. दिलीप यांच्या कठीण प्रसंगातही सायरा यांनी त्यांची साथ कधीच सोडली नाही. आता ५० वर्षांहूनही अधिक काळ हे दोघे एकत्र आहेत. या दोघांकडे पाहूनच प्रेम काय असतं, ते कसं निभावून न्यावं याचं उत्तम उदाहरणच मिळतं. आजही सायरा बानो या दिलीप कुमार यांच्यावर तेवढंच प्रेम करतात जेवढं त्या ५० वर्षांपूर्वी करायच्या. एवढी वर्षे चिरतरुण राहिलेलं त्यांचं प्रेम यापुढेही तसेच राहो अशीच आशा त्यांचे चाहते करत असतील यात काही शंका नाही.