काही चित्रपट अनेक वर्षे सरली तरी ते आजचे वाटतात पण त्यातला आशयदेखिल काळाच्या खूप पुढचा असेही वाटते. आर. के. फिल्मचा 'हीना' देखिल अगदी तसाच. त्याच्या प्रदर्शनाचे हे रौप्यमहोस्तवी वर्ष आहे. २८ जून १९९१ रोजी हीना झळकला. पण हीना म्हणताक्षणी खूप गोष्टी भरभर डोळ्यासमोर येतात. हीना म्हणजे मेहंदी चित्रपटाचे हे नाव खरोखरच सिध्द झाले असे वाटते. खरं तर 'हीना' चित्रपट हे राज कपूरचे केव्हापासूनचे तरी स्वप्न! बॉबी (१९७३) पासूनचे म्हणायला हवे. पण ते सतत पुढे जात राहिले. या चित्रपटासाठीच्या दोन गाण्यांचे ध्वनीमुद्रण १९८८ साली राज कपूरने केले. नंतर २ जून १९८८ रोजी राज कपूरचे निधन झाले व त्याचे हे स्वप्न त्याचा पुत्र रणधीर कपूरने दिग्दर्शित करायचे ठरवले. रणधीरने तत्पूर्वी 'कल आज और कल' (१९७१) व 'धरम करम' (१९७६) या चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. राज कपूरच्याच हयातीत ऋषि कपूर व झेबा बख्तियार यांची निवड झाली होती. कथा पटकथेची गरज म्हणून पाकिस्तानची अभिनेत्री झेबाची निवड झाली होती. राज कपूर आपल्या दिग्दर्शनातील अभिनेत्रीची निवड खूपच विचारपूर्वक करतो अशी ख्याती होती. हीनामधील दुसरी अभिनेत्री म्हणून कोणाची निवड करणार याचे बरेच दिवस कुतुहल होते व अचानक एके दिवशी अश्विनी भावेचे नाव आले आणि त्यामुळे मराठी रसिक मनात प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले. आर. के.च्या चित्रपटाची नायिका होणे तेव्हा कमालीचे प्रतिष्ठेचे होते. इतर भूमिकांत जावेद खान, अवतार गिल, रिमा लागू इत्यादींची निवड झाली. कला दिग्दर्शक सुरेश सावंत यानी कमालच केली. भारत पाकिस्तान सीमेवरच्या बारामुल्ला गावाचा सेटच कुलु मनालीत लावला. रविन्द्र जैनच्या गीत संगीतामधील 'खुश रंग हीना.', 'अनार दाना..', 'देर ना हो जाए कही देर ना हो जाए' अशी गाणी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच हिट झाल्याने हीनाचे प्रेक्षकांकडून चांगले स्वागत होईल अशी अपेक्षा वाढली. आम्हा समिक्षकांसाठी चेंबूरच्या आर. के. मधीलच मिनी थिएटरमधे हीनाच्या खेळाचे आयोजन झाले. रणधीरने प्रत्येकाचे स्वागत केले हे विशेष. हिनाचे कथानक थोडक्यात सांगांयचे झाले तर, साखरपुड्याच्याच दिवशी वादळी वारा पावसात गाडीला अपघात झाल्याने नायक (ऋषि कपूर) नदीतून वाहत वाहत पाकिस्तानात जातो. दुर्दैवाने त्याची स्मृति गेलेली असते. तिकडे एक युवती हीना त्याच्या प्रेमात पडते. यालाही भावनिक आधार मिळतो. काही काळाने त्याची स्मृति पररते. तेव्हा आता काय असा पेच निर्माण होतो. पण धर्म व देश यांच्या सीमा ओलांडुन हे प्रेम यशस्वी ठरते अशी हीनाची कथा कल्पना. चित्रपटाला साधारण यशावरच समाधान मानावे लागले तरी त्याचा आशय खूपच मोठा व महत्वाचा आहे. तोच तर महत्वाचा असतो. दिलीप ठाकूर