आपल्या वाचाळ वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल राखी सावंत हिचे टेलिव्हिजनवर स्वयंवर होऊन सात वर्षे उलटली आहेत. तरीही, राखी अद्याप योग्य वराच्या शोधात आहे.

राखी का स्वयंवर या गाजलेल्या शोमध्ये राखीने अनिवासी भारतीय एलेश परुजनवाला याच्याशी साखरपुडा केल्यानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत राखी सावंत म्हणाली की, मी पैशांसाठी एलिशसोबत साखरपुडा केला होता. मला फ्लॅट विकत घ्यायचा होता. मी खोटं का बोलू? नंतर पुढे जाऊन घटस्फोट द्यावा लागेल अशा व्यक्तिशी मी लग्न करणार नाही. सध्या मी कोणालाही डेट करत नाहीये. प्रसारमाध्यमांनी माझी जी प्रतिमा निर्माण केली आहे, त्यामुळे मला चांगले काम मिळत नाहीये. मला एखाद्या तरुण मुलाशी किंवा नाव कमविण्यासाठी झगडत असलेल्या एखाद्या व्यक्तिशी लग्न करण्याची इच्छा नाही. मी एखाद्या प्रौढ आणि संपन्न अशा व्यक्तिच्या शोधात आहे. जो माझी काळजी घेईल आणि माझ्या गरजा पूर्ण करेल.

राखीने काही वर्षांपूर्वी तिचा स्वतःचा पक्ष सुरु केला होता. राजकारणात यापुढे कार्यरत राहणार की नाही याविषयी बोलताना ती म्हणाली की, माझा राजकारणात जाण्याचा निर्णय चुकीचा होता. त्याचसोबत मी टेलिव्हिजन क्षेत्रही सोडलेले नाही. आज मी जे काही आहे ते टेलिव्हिजन आणि माझ्या आयटम नंबर्समुळेच. मी राजकारण खेळत नाही. लवकरच राखी सावंत सावधान इंडियाच्या एपिसोडमध्ये झळकणार आहे. या भागात ती सूनेची नकारात्मक भूमिका साकारताना दिसेल. त्यात तिने एका १६ वर्षाच्या मुलाशी लग्न केल्याचे दाखविण्यात आले आहे.

तुझी समाजात जी प्रतिमा आहे त्यामुळे तुला गंभीर भूमिका मिळत नाहीत का? असा प्रश्न विचारला असता ती म्हणाली की, केवळ साडी नेसल्याने सून होता येत नाही. माझ्यामध्ये अहंकार नाही. त्यामुळे कामासाठी कोणालाही विचारण्यास मला काहीच वाटत नाही. मला केवळ चांगले काम करण्याची इच्छा आहे.