आलिया भट्ट आणि वरुण धवन या जोडीचा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाने फक्त प्रेक्षकांच्या मनातच नव्हे, तर बॉक्स ऑफिसवरही धमाकेदार कमाई केली आहे. चित्रपटाने १०० कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविले आहे. ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’चा सिक्वल असणाऱ्या या चित्रपटात दिग्दर्शकाने आलियाला एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्यासमोर आणल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटात आलिया महिलांची ताकद दाखवून देताना दिसते. तर बद्री म्हणजेच वरुण धवन तिला बळ देताना दिसला आहे. चित्रपटात दोघांच्या भूमिकेचे कौतुक होत असताना या चित्रपटातील वरुणवर चित्रित करण्यात आलेल्या अतिप्रसंगाच्या सीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या सीनवर नेटिझन्सनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे या सीनची चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.

ज्यावेळी आलियाच्या शोधात वरुण धवन सिंगापूरला जातो, त्यावेळी वरुण धवनचा विनयभंग झाल्याचे चित्रतपटात दाखविण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये पुरुषांवर अतिप्रसंग ओढावल्याच्या या प्रसंगावर खुद्द वरुणने प्रतिक्रिया दिली आहे. चित्रटातील हा सीन बिलकूल आक्षेपार्ह नसल्याचे तो म्हणाला. बद्रीचा अहंकार दडपण्यासाठी नव्हे तर विनोद निर्माण करण्यासाठी हा सीन दाखविण्यात आल्याचे वरुणने ‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

चित्रपटामधील अतिप्रसंगाच्या सीनमध्ये वावगे काही नसल्याचे सांगताना त्य़ाने आमिर खानच्या चित्रपटाचा दाखला दिला. आमिरच्या ‘थ्री इडियट्स’ चित्रपटात ‘चमत्कार’ या शब्दात हेराफेरी करुन ज्या प्रमाणे ‘बलात्कार’ या शब्दाचा वापर करण्यात आला होता. त्याच प्रमाणे बद्रीच्या रुपात विनोद करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असेही त्याने स्पष्ट केले. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत तब्बल १०३ कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी ही जोडी ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ आणि ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात दिसली होती. या दोन चित्रपटाप्रमाणेच या जोडीला प्रेक्षकांनी पुन्हा एकदा दाद दिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्याच्या घडीला आलिया -वरुण जोडी सुपर हिट ठरताना दिसत आहे.