उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने पाकिस्तानी कलाकारांना देश सोडून जाण्यासाठी’अल्टिमेटम’ दिले होते. त्यानंतर इंडियन पिक्सचर्स प्रोड्युसर्स असोसिएशनने (इम्पा) देखील पाकिस्तानी कलाकार, गायक यांना यापुढे हिंदी चित्रपटामध्ये काम न देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खान याने शुक्रवारी एका कार्यक्रमात पाकिस्तान कलाकारांना पाठींबा दिला. सलमानच्या या भूमिकेमूळे त्याच्यावर टीकेचा भडीमार होत आहे.
सलमानने पाकिस्तानी कलाकारांना पाठिंबा देऊन स्वतःहूनच वादाला आमंत्रण दिले. जर सलमानला पाकिस्तानी कलाकार इतकेच आवडत असलीत तर त्याने पाकिस्तानात जाऊन राहावे अशी टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे म्हणाल्या की, सलमानला धडा शिकवण्याची गरज आहे. त्याचे पाकिस्तानी कलाकारांवर इतकेच प्रेम असेल तर त्याने तेथे जाऊन राहावे. दरम्यान, पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलेल्या सलमानवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही निशाणा साधला. सलमान खानची ट्युबलाईट मधेमधे पेटत असते. अशा भाषेत राज यांनी सलमानचा समाचार घेतला. ‘टाइम्सनाऊ’  या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये राज यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीचे समर्थन करणाऱ्या सलमानला सुनावले. सीमारेषेवर तैनात जवान छातीवर झेलत असणाऱ्या गोळ्या या फिल्मी नसतात,असे सांगत सलमानला त्यांनी फटकारले. ‘भारतीय जवानांना गोळ्या लागतात त्या फिल्मी नसतात, तर त्या खऱ्या असतात आणि सलमान खानला ज्या गोळ्या लागतात त्या खोट्या असतात.’ असे राज यांनी म्हटले होते.
दिल्लीत शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात सलमान म्हणालेला की, ते कलाकार आहेत, दहशतवादी नाहीत. सरकारच त्यांना व्हिसा आणि कामाचा परवाना देतं. कला आणि दहशतवाद यांची गल्लत होता कामा नये.