पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्याही खुशमस्कऱ्याची किंवा चमच्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली. ते बुधवारी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘एक्स्प्रेस अड्डा’ या कार्यक्रमात बोलत होते. निहलानी यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, माझ्या मते अशाप्रकारची वक्तव्ये करणे टाळले पाहिजे. पंतप्रधानांनी स्वत:हूनच ते संपूर्ण देशाचे प्रधान सेवक असल्याचे सांगितले आहे. मला वाटत नाही की, प्रधान सेवकांना कोणत्याही खुशमस्कऱ्याची गरज आहे, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले. तसेच सरकार सर्जनशीलतेच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करते असे सांगताना सेन्सॉर बोर्डाच्या कारभारात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
होय, मी नरेंद्र मोदींचा चमचा ! 
रविशंकर प्रसाद यांच्या या विधानामुळे स्वत:ला मोदींचा चमचा म्हणवून घेण्यात धन्यता मानणारे पहलाज निहलानी चांगलेच तोंडघशी पडले आहेत. चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी काल केलेल्या विधानामुळे ‘उडता पंजाब’ चित्रपटावरून निर्माण झालेला वाद विकोपाला गेला होता. होय, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चमचा असून, मला त्याचा अभिमान आहे, असे त्यांनी म्हटले होते. मी इटालियन पंतप्रधानांचा चमचा बनावे का, असा प्रतिसवाल करीत निहलानी यांनी अनुराग कश्यपबाबत केलेल्या आरोपावरून माफी मागण्याची किंवा राजीनामा देण्याची मागणी फेटाळून लावली होती.
मला उत्तर कोरियात राहत असल्यासारखे वाटतेय; अनुराग कश्यपची संतप्त प्रतिक्रिया