झी मराठी वाहिनीवरील सध्याच्या घडीला अत्यंत गाजलेली मालिका म्हणजे 'रात्रीस खेळ चाले'. एका थरारक कथानकाच्या पार्श्वभूमीचा आधार घेत काही महिन्यांपूर्वी ही मालिका सुरु झाली होती. कोकणातील पात्रांची पार्श्वभूमी, पट्टीचे कलाकार आणि कथानकाच्या बळावर या मालिकेने प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये स्थान मिळवले. नुकताच या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्या भागामध्ये नाईकांच्या वाड्यातूनच नेने काकांच्या खुन्याच्या हातात पोलिसांनी बेड्या ठोकल्या. खरा खुनी कोण हा प्रश्न अनेकांच्याच मनात घर करत असतानाच 'निलिमा' या पात्राच्या हातात बेड्या ठोकत या सर्व खेळाला पूर्णविराम देण्यात आला. पण या मालिकेमध्ये वारंवार 'काय ता.?' आणि 'इसरलंय..' असे म्हणत भरकटलेल्या पांडूप्रमाणेच मालिकेचे कथानक शेवटीशेवटी काही भरकटले असाच सूर काहींनी लगावला आहे. मालिकेच्या सुरुवातीला काहीसा थरार पाहायला मिळत असल्यामुळे उत्सुकतेच्या पोटी प्रेक्षकांनी या मालिकेला अक्षरश: उचलून धरले होते. त्यातही या मालिकेमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणून धरण्यात आली होती. ज्यामुळे अनेकांनी त्यांच्या खुरापाती विचारांना चालनाही दिली होती. पण, 'नेने' वकिल आणि 'अजय'च्या खुनामागे कोणाचा हात होता हे उघड झाले असले तरीही प्रेक्षकांच्या काही प्रश्नांची उत्तरे मात्र अनुत्तरितच राहिली आहेत. ही मालिका संपल्यानंतर सोशल मीडिया आणि विविध ठिकाणी रंगणाऱ्या चर्चांमध्ये सर्वसामान्य प्रेक्षकांनी त्यांचे हे प्रश्न उभे करत त्यांच्यातील 'विश्वासराव' जागा केला आहे असेच म्हणावे लागेल. खेळ संपूनही अनुत्तरित राहिलेले काही प्रश्न: नानांना नेमकं कोण दिसत होतं आणि ते जे काही म्हणायचे त्यांचा अर्थ काय होता? बाहुली खड्ड्यात पुरताना तिची हालचाल झाली होती, त्यामागचं रहस्य काय? तिच बाहुली देविकाच्या घराबाहेरही दिसली, ती तिथे कशी पोहोलची? निलिमाने नेने वकिलांच्या खुनाचा कट कसा रचला? पांडू लपवत असलेल्या दागिन्यांचे काय झाले? पांडूला अण्णा दिसण्यामागचं गौडबंगाल काय होतं? माईंना दिसणाऱ्या अण्णांचं गुपित काय होतं? हळदीकुंकू समारंभाच्या दिवशी विधवा माईंनी केलेल्या साजश्रृंगाराचं रहस्य काय? कपाटातून माधव जमिनीचे कागदपत्र काढताना त्याच्यावर जीवघेणा हल्ला कोणी केला होता? तळघरातील हाडांच्या सापळ्याचे काय झाले? माधवच्या कादंबरीचं काय झालं? तपास सुरु असताना घरातून पसार झालेला गणेश नेमका कुठे सापडला? हे काही प्रश्न तसेच अनुत्तरित राहिले आहेत. त्यामुळे रात्रीचा हा खेळ असा अर्ध्यावरच का सोडण्यात आला असाच प्रश्न रसिकांना पडत आहे.