अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची जोडी बॉलिवूडमधीलच नाही तर जगातील आवडत्या कपल्सपैकी एक आहे. त्यांच्याशी संबंधित सगळ्याच बातम्या नेहमी ट्रेंण्ड होत असतात. बच्चन कुटुंबाकडे तसे साऱ्यांचेच लक्ष असते पण त्यातही या जोडप्याकडे खास लक्ष असते असेच म्हणावे लागेल. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याला सुरूवात होण्यापूर्वी त्यांच्या आयुष्यात काही व्यक्ती येऊन गेल्या होत्या. सुरूवातीला ऐश्वर्या आणि सलमानचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. पण काही कारणांमुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. अभिषेकच्या आयुष्यातही करिष्मा कपूर होती. दोघांचा साखरपुडाही झाला होता. दोघंही एकमेकांना अगदी लहानपणापासून ओळखत होते. २००० मध्ये करिना कपूर आणि अभिषेक बच्चन यांनी 'रेफ्युजी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. करिनासोबत करिष्माही अनेकदा सेटवर यायची. यावेळीच त्यांच्या प्रेमकहाणीला सुरूवात झाली. पण २००२ मध्ये 'हां मैंने भी प्यार किया' या सिनेमाच्या सेटवर दोघांची मनं जुळली. दोन्ही घराणी ही बॉलिवूडशीच निगडीत असल्यामुळे घरच्यांनाही या लग्नामध्ये काहीच अडचण वाटली नाही. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवशी दोघांनी साखरपुडाही केला. पण नंतर मात्र त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. त्यांच्या दुराव्याचे मुख्य कारण अभिषेकची आई जया बच्चन असल्याचे म्हटले जात होते. लग्नानंतरही सिनेमात काम करावे, अशी करिष्माची इच्छा होती. तर या गोष्टीला जया यांचा पुरता विरोध होता. लग्नानंतर सुनेने सिनेमात काम करु नये, अशी जया यांची इच्छा होती. नेमक्या याच कारणामुळे अभिषेक आणि करिष्मामध्ये वाद होऊ लागले. अभिषेकने आईची बाजू घेतली आणि त्यांचे नाते संपुष्टात आले. यानंतर आयुष्यात पुढे जात करिष्माने उद्योगपती संजय कपूरसोबत २००३ मध्ये लग्न केले. पण त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. २०१३ मध्ये करिष्माने घटस्फोट घेतला. या मधल्या काळात अभिषेकच्या आयुष्यात ऐश्वर्याचे आगमन झाले होते. २००७ मध्ये त्यांनी राजेशाही थाटात लग्न केले. दोघांना आता आराध्या नावाची गोड मुलगीही आहे.