जम्मू-काश्मीरमध्ये जमावानं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची बेदम मारहाण करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. तर दुसरीकडे दिल्लीहून मथुरेकडे जाणाऱ्या पॅसेंजर गाडीत बसण्याच्या जागेवरून १५ वर्षांच्या मुलाची हत्या करण्यात आली. देशात वाढत चाललेल्या या जातीय व धार्मिक हिंसाचाराच्या घटनांबद्दल सुप्रसिद्ध गीतकार आणि माजी खासदार जावेद अख्तर यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. 'बंधु-भगिनींनो, आपला देश कुठे चाललाय हे आपल्याला शांतपणे बसून विचार करण्याची वेळ आली आहे,' असे जावेद अख्तर यांनी ट्विट केले आहे. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे संतप्त जमावाने गुरुवारी रात्री उशिरा एका पोलीस उपअधीक्षकाची दगडानं ठेचून हत्या केली होती. ते मशिदीचा फोटो काढत असल्याच्या गैरसमजामुळे गोंधळ उडाला. पोलीस अधिकाऱ्याने हवेत गोळीबार केला. त्यात ३ लोक जखमी झाले. त्यानंतर जमावाने पोलीस उपअधीक्षक पंडित यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली. तसंच दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. वल्लभगड येथील खंदावली गावातील जुनैद, हाशिम, शाकिर मोहसिन आणि मोईन हे गुरुवारी रात्री उशिरा ईदनिमित्त खरेदी करून दिल्लीहून परतत होते. तुघलकाबाद स्थानकात चार जण पॅसेंजर गाडीत चढले. बसण्याच्या जागेवरून त्यांनी या चौघांशी वाद घातला. त्या तरुणांनी बीफ बाळगल्याचा आरोप करत चौघांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. गाडीत बसलेले अन्य तरुणही एकत्र आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. वाचा : जान्हवी कपूरचा 'लव्ह ट्रँगल'? हिंसाचाराच्या या वाढत्या घटनांमुळे देशात अस्वस्थता आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जावेद अख्तर यांनी देशवासीयांना अंतर्मुख होण्याचे आवाहन केले आहे. काश्मीर आणि हरयाणातील घटनांचा संदर्भ देऊन आपला देश कुठे चाललाय हे सर्वांना शांतपणे बसून विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.