मराठी माणुस असं म्हटलं की त्याचं छत्रपती शिवाजी महाराजांवरचं नित्सिम प्रेम डोळ्यांसमोर येतं. देवावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच श्रद्धा या नावावरही लोकं करतात. पण त्याहून अर्धा टक्का जरी काळजी महाराजांनी मेहनतीने बांधलेल्या गड, किल्ल्यांची घेतली असती तर आज महारांपेक्षा खूश दुसरे कोणीच नसते. हेमंत ढोमेच्या ‘बघतोस काय मुजरा कर’ या आगामी सिनेमामध्येही काहीसा हाच आशय घेण्यात आला आहे. नुकताच या सिनेमाचा पहिला दमदार संवाद सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. शिवाजी महाराजांनी एवढ्या मेहनतीने बांधलेल्या गडाची सध्या जी दुरावस्था झाली आहे त्याबद्दल तर सर्वांनाच माहित आहे. याच मुद्यावर जितेंद्र जोशी एका मुलाला दम भरताना या प्रोमोमध्ये दिसत आहे. यात जितेंद्र त्या मुलाला म्हणतो की, ‘गडाची नासधूस करण्याबद्दल ओरडताना म्हणाला की, हा गड तुझ्या माझ्या अख्या महाराष्ट्राच्या बापाचा गड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे. जर या गडाकडे वाकड्या नजरेने पाहिले तर डोळे काढून गोट्या खेळतील आमची पोरं.’ या सिनेमाचे काही शूट लंडनमध्येही झाले आहे. त्यामुळे जर संहिता चांगली असेल तर आता मराठी सिनेमाही सातासमुद्रापार सहज जातो हेच यातून दिसून येतंय. ३ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे एक चांगल्या आशयाचा सिनेमा प्रेक्षकांना लवकरच पाहता येणार आहे हे मात्र नक्की. ‘पोस्टर गर्ल’ सारखा अनेक उत्तम सिनेमा लिहिलेला अभिनेता हेमंत ढोमे ‘बघतोस काय मुजरा कर’ या सिनेमाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतो आहे. हेमंतनंच या सिनेमाचे लेखन केले आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट आणि गणराज प्रॉडक्शन यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचा ट्रेलर लोकार्पण कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी निर्माते गोपाळ तायवाडे, वैष्णवी जाधव, संजय छाब्रिया, दिग्दर्शक हेमंत ढोमे, अभिनेता जितेंद्र जोशी, अनिकेत विश्वासराव, अक्षय टांकसाळे, पर्ण पेठे, नेहा जोशी, रसिका सुनील, संगीतकार अमितराज, गीतकार क्षितिज पटवर्धन, संकलक फैजल महाडिक आदी या वेळी उपस्थित होते. खास या कार्यक्रमासाठी राज्यभरातील गडकोटांच्या संवर्धनसाठी स्वयंस्फूर्तीनं कार्यरत असलेल्या २२ संस्थांचे प्रतिनिधीही आले होते. ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ च्या घोषाने वातावरण दणाणून गेले होते.