अनेकजण रजनीकांत यांना भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार मानतात. परंतु, नाना पाटेकर या मताशी सहमत नाहीत. ‘कबाली’ चित्रपटाचे नायक रजनीकांत आणि अन्य कोणालादेखील नाना पाटेकर भारतीय चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार मानत नाहीत. त्यांच्या मते सुपरस्टारपेक्षा चित्रपट जास्त महत्वाचा आहे. रजनीकांतविषयी नाना पाटेकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, चित्रपटच एक सुपरस्टार असतो. जर का तुमची कथा छान असेल, तिचे चांगल्याप्रकारे सादरीकरण केले आणि कलाकार नवीन असतील तरीदेखील चित्रपट चांगली कामगिरी करेल. स्टारच्या नावावर चित्रपट केवळ एक अथवा दोन दिवस चालेल. चित्रपट चांगला नसेल, तर त्यानंतर तो चालणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. शुक्रवारी रजनीकांत यांचा ‘कबाली’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. अनेक चित्रपटगृहात तर सकाळी पाच वाजल्यापासून चित्रपटाचा शो सुरू झाला होता. पहिल्या तीन दिवसांची सर्व तिकीट विक्री पूर्ण झाली होती. सॅटेलाइट्स अधिकार विकून चित्रपटाने अगोदरच २०० कोटीची कमाई केली आहे. असे असले तरी चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. चित्रपटाच्या कथेत दम नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
एखाद्या चांगल्या कथेसाठी लेखक जबाबदार असल्याने नाना पाटेकर यांनी याचे श्रेय लेखकांना दिले आहे. चांगल्या कथेमुळे चित्रपट यशस्वी होत असून, अभिनेता सुपरस्टार बनत असल्याचे ते म्हणाले. हल्ली लेखकांना महत्व मिळायला लागले आहे. सलीम-जावेद जोडीने आमच्या इंडस्ट्रीत लेखकांना चांगले स्थान मिळवून दिले. एक चित्रपट चांगल्या प्रकारे तेव्हाच साकारतो, जेव्हा त्या चित्रपटाची कथा चांगली असते. जर कथा चांगली नसेत, तर चित्रपटदेखील चांगल्याप्रकारे साकारला जाणार नाही. चांगली कथा नसलेल्या चित्रपटाला कोणताही मोठा अभिनेता वाचवू शकणार नाही. असा चित्रपट केवळ एक अथवा दोन दिवस चालेल. स्टार प्रेक्षकांना चित्रपटगृहात दोन दिवसांपर्यंतच आणू शकतो, असे ते म्हणाले.
काळवीट प्रकरणातून अभिनेता सलमान खानची मुक्तता झाली, यावरदेखील त्यांनी मतप्रदर्शन केले. जर तो मुक्त झाला असेल, तर त्याच्यासाठी ही चांगलीबाब असल्याचे ते म्हणाले.