दिग्गज बॉलिवूड अभिनेते कादर खान यांची तब्येत गेल्या काही वर्षांपासून खालावलेली होती. हो गया दिमाग का दही या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ते व्हिलचेअरवरुन आले होते. त्यावेळीही त्यांना बोलताना आणि चालताना त्रास होत होता. स्पॉटबॉय या इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेते शक्ती कपूर यांनी सांगितले की, कादर खान यांना चालताही येत नव्हते. ते व्हिलचेअरच्या सहाय्याने फिरत होते. याबद्दल सांगताना मला फार वाईट वाटत आहे. गेल्या काही दिवसांपासून मी त्यांना भेटायचा प्रयत्न करत आहे. पण मला त्यांचा नंबरच मिळत नाहीये. येत्या २- ३ दिवसांत मला नंबर मिळेल असे वाटते.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, शक्ती कपूर यांनी सांगितले की, ‘कादर खान यांचा मोठा मुलगा कॅनेडामध्ये राहतो. त्यामुळे चांगल्या उपचारांसाठी त्यांना आता कॅनेडामध्ये नेण्यात आले आहे. मला वाटते की कादर खानसोबत त्यांची पत्नीदेखील कॅनेडाला गेल्या आहेत.’ नक्की कादर खान यांना काय झाले असा प्रश्न जेव्हा शक्ती कपूर यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, ‘कादर खान यांना गुडघ्याचा त्रास होता. या त्रासावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण, ही शस्त्रक्रिया योग्य झाली नाही आणि त्यांचा गुडघ्यांचा त्रास अजून वाढला. २०१५ मध्ये त्यांच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण या शस्त्रक्रियेचा फारसा फायदा त्यांना झाला नाही.’

कादर खान यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात संवाद लेखक म्हणून केले होती, त्यानंतर ते अभिनयातही आले. २०१५ मध्ये आलेल्या हो गया दिमाग का दही सिनेमाच्या प्रमोशनवेळी ते म्हणाले होते की, आत्ताच्या लेखनात खूप चांगले बदल झाले आहेत. आत्ताचं लेखन पाहून त्यांनाही परत एकदा लेखन करावेसे वाटत होते. २०१४ मध्ये कादर खान आपल्या पत्नी आणि सरफराज आणि शाहनवाज या दोन मुलांसह मक्क्यालाही गेले होते. तेव्हाही त्यांना नीटसे चालता येत नव्हते. शाहनवाजही एक अभिनेता आहे. तेरे नामसारख्या सिनेमात त्याने काम केले आहे.