कॉमेडी किंग आणि सूत्रसंचालक कपिल शर्माच्या मागे लागलेला वादांचा ससेमिरा काही संपता संपत नाहीये. ‘द कपिल शर्मा शो’मुळे तो पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या शोचे कायमस्वरुपी विशेष अतिथी असलेले नवज्योत सिंग सिद्धू यांच्या जागी काही एपिसोड्ससाठी अर्चना पुरण सिंग हिला आणण्यात आले. पण हे काही सिद्धूंना रुचले नाही.

‘स्पॉटबॉय ई’ वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, ‘द कपिल शर्मा शो’मधील या बदलानंतर नवज्योत आणि कपिल यांच्यातील वातावरण काही ठीक नाही. पण, सिद्धूंच्या जागी दुसऱ्या कोणाला घेण्याचा कधी विचारही न केल्याचे कपिलने ‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

वाचा : ‘डबल रोल’ साकारणारा पहिला कलाकार कोण माहितीये का?

कपिल म्हणाला की, ‘या बातमीत काहीच तथ्य नाही. दुसरं कोणीतरी काही दिवसांसाठी सिद्धूंच्या जागी येणे यापूर्वीही झालेय. उदाहरण द्यायचेच झाले तर, ‘सैराट’च्या टीमसोबत आम्ही शूट करत होतो तेव्हा सिद्धू सर तेथे नव्हते. इतकेच नव्हे तर जॅकी चॅन आलेले तेव्हा आम्ही सिद्धूंच्या जागी रविना टंडन यांना बोलावले होते. सिद्धूंची जागा दुसऱ्या व्यक्तीला दिल्याचे वृत्त मी वाचले पण सत्य हेच आहे की, याविषयी मी सिद्धू पाजी यांच्याशी काहीच बोललो नाही.’ कपिल आणि सिद्धू यांच्यात काहीतरी वाद असल्यामुळेच त्यांच्या जागी अर्चनाला आणण्यात आल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.

वाचा : …जेव्हा अजयच्या सुरेल आवाजाने आमिर खान मंत्रमुग्ध होतो

सिद्धूजींच्या जागी दुसऱ्या कोणाला आणण्याचा मी विचारदेखील केलेला नाही. मी जेव्हा कधी शूटींगचा विचार करतो तेव्हा माझ्या डोक्यात पहिले नाव त्यांचेच असते. ते माझ्यासाठी लकी आहेत, असेही कपिल म्हणाला.