जवळपास आठवड्यापूर्वी ‘द कपिल शर्मा शो’मधील वातावरण काही वेगळे होते. या शोमधील कलाकार जणू एका कुटुंबाप्रमाणेच एकत्र होते. पण, आता हे चित्र पूर्णपणे पालटले आहे. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वादामुळे टेलिव्हिजन विश्वात खळबळ उडाली आहे. त्यांच्यातील वादाच्या वृत्तानंतर सुनील ग्रोव्हर यापुढे ‘द कपिल शर्मा शो’ करणार की नाही यावर अजून प्रश्नचिन्ह कायम आहे.
‘द कपिल शर्मा शो’ची संपूर्ण टीम ऑस्ट्रेलियामधील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर मुंबईला परतत होती. तेव्हा नक्की काय घडले याचा सविस्तर घटनाक्रम देत आहोत.

१. द कपिल शर्माची संपूर्ण टीम १६ मार्चला मेलबर्न ते मुंबई या १२ तासांच्या विमानप्रवासाला निघाली. त्यावेळी उपस्थित प्रत्यक्षदर्शींनी ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या माहितीनुसार कपिल शर्माने व्हिस्कीची पूर्ण बाटली रिकामी केली आणि तो पूर्णपणे मद्याच्या धुंदीत होता.

२. मेलबर्नवरून विमानाने उड्डाण करताच शोमधील टीमने जेवणास सुरुवात केली. आपल्यासाठी कोणीच कसं थांबल नाही या विचाराने कपिलला तेव्हा राग आला आणि तो मद्यपान करू लागला.

३. कपिल म्हणाला, ‘जब मैने खाना शुरु नही किया, तो तुम लोगो ने कैसे ले लिया खाना?’ तो जोरजोरात बोलल्याने विमानातील इतर प्रवाशांचे लक्ष त्याच्याकडे केंद्रित झाले. कपिलच्या अशा वागण्याने अस्वस्थ झालेल्या त्याच्या टीमने जेवण अर्धवटच सोडले.

४. त्यानंतर शोमध्ये डॉ. मशहूर गुलाटीची भूमिका साकारत असलेल्या सुनीलने पुढे सरसावत कपिलला शांत करण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, कपिल इतका रागावलेला होता की, त्याने पायातील बूट काढून सुनीलला फेकून मारला. इतकेच नव्हे तर त्याने सुनीलची कॉलर पकडली आणि लागोपाठ त्याच्या कानशिलात लगावल्या.

kapil-sharma-sunil-grover-7592

५. हा वाद इतका पेटला की, इकॉनॉमी क्लासमध्ये बसलेल्या प्रवाशांनाही त्यांचे आवाज जात होते. कपिलच्या वागण्याने आम्हीही घाबरलो, असे त्याची टीम म्हणाली. ‘तुम लोगो को मैने बनाया है. सबका करिअर खत्म करू दूँगा. सबको निकाल दूँगा मै’, असे कपिल जोरजोरात ओरडत असल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

६. कपिल एवढ्यावरच थांबला नाही. सुनीलने याआधी त्याचा ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ हा शो सोडला होता. याच गोष्टीला निशाणा करत तो सुनीलला म्हणाला की, ‘गया था ना तू तो. आया ना वापस मेरे ही पास’.

७. कपिलच्या या कृत्यानंतर केबिन क्रूने विमानाचे लँडिग झाल्यानंतर आम्ही सुरक्षारक्षकांना बोलवू, असा इशारा दिला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

८. कपिल सतत किकू शारदा आणि अली असगरला रोजंदारीवर काम करणारे असे संबोधत होता. तसेच, त्यांचे करिअर संपवून टाकण्याची धमकीही त्याने यावेळी दिली.

गेल्या गुरुवारी घडलेली ही घटना शनिवारी सर्वांसमोर आली. विशेष म्हणजे, कपिलने त्याच्या प्रेयसीची माहिती सर्वांना सोशल मीडियावरून दिली आणि त्याच्या काही तासांनंतरच कपिल-सुनीलचे भांडणसमोर आले. गेल्या काही वर्षांपासून कपिल गिन्नी चतार्थ हिला डेट करत असून, लवकरच तिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

या घटनेनंतर सुनीलने अद्याप ‘द कपिल शर्मा शो’साठी शूटींग केलेले नाही. पण, हा शो सोडायचा की नाही हे अद्याप मी ठरवलेले नाही, असे सुनीलने इंडियन एक्स्प्रेस संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. सुनीलच्या समर्थनार्थ त्याचे सहकलाकार चंदन प्रभाकर आणि अली असगर यांनीही शूटींग करण्यास नकार दिला आहे. दरम्यान, हे तिघेही हा शो सोडणार असल्याच्या चर्चा टेलिव्हिजन वर्तुळात सुरु आहेत. किकू शारदा आणि सुमोना चक्रवर्ती हे मात्र शूटींगसाठी सेटवर जात असल्याचे कळते.