निर्माता-दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आला आहे. करणच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वाटा मोकळ्या करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक कलाकार त्याच्या मदतीला धावून आले होते. बॉलिवूड विश्वामध्ये करण जोहर त्याच्या मनमिळाऊ स्वभावासाठी आणि अनेकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी ओळखला जातो. पण हाच करण जोहर एकेकाळी बी टाऊनमधील एका अभिनेत्रीच्या कारकिर्दीवर नजर ठेवून होता. त्या अभिनेत्रीचा करणला राग होता आणि तिचे करिअर बिघडवण्यासाठीसुद्धा त्याने प्रयत्न केले होते. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून त्याच्याच आगामी चित्रपटामधील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणारी अनुष्का शर्मा आहे.

मुंबईत पार पडलेल्या ‘मामि’ फिल्म फेस्टिव्हलदरम्यान करणने याबाबतचा खुलासा केला आहे. ‘अनुष्काचे करिअर बिघडवण्याचा मी प्रयत्नही केला होता. पण, तो अयशस्वी ठरला’, असे करण या कार्यक्रमादरम्यान म्हणाला. करणने सांगितले की, त्याला अनुष्काची प्रतिमा अजिबात पसंत नव्हती. त्यामुळेच त्याने ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटामध्ये कोणा दुसऱ्याच अभिनेत्रीला घेण्याचा सल्लाही आदित्य चोप्राला दिला होता. पण आदित्यनेही करणचे न ऐकता या चित्रपटामध्ये अनुष्कालाच संधी दिली होती. हा चित्रपट पाहिल्यानंतर करणला अनुष्काचे कामही आवडले नव्हते असा खुलासाही त्याने केला. पण, ‘बॅण्ड बाजा बारात’ या चित्रपटानंतर मात्र अनुष्काबद्दलचे करणच्या मनातील विचार बदलले. आता तर करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये अनुष्का शर्मा महत्त्वाच्या भूमिकेमध्ये झळकत आहे.

करणने केलेल्या या गौप्यस्फोटाबद्दल अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने करणची प्रशंसा केली आहे. सर्वांसमोर असा एखाद्या गोष्टीबाबत खुलासा करणे ही काही सोपी बाब नाही आणि हे करणलाच चांगले जमते’, असे ऐश्वर्या म्हणाली. मात्र करणच्या या विधानावर अनुष्का शर्माने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान करणच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटामध्ये अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. एकतर्फी प्रेम, मैत्री आणि त्यातून बदलत जाणारी नात्यांची समीकरणं असे कथानक या चित्रपटाद्वारे हाताळण्यात आले आहे. २८ ऑक्टोबरला हा चित्रपट सरतेशेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.