हिंदी चित्रपटसृष्टीत बऱ्याच कलाकारांच्या वाट्याला फारशी मोठी कारकिर्द किंवा घवघवीत यश आलं नाही. पण प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मात्र हे कलाकार यशस्वी झाले होते. त्यातीलच एक नाव म्हणजे अभिनेत्री बबिता. बॉलिवूड चित्रपटांचा ‘गोल्डन एरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळात बबिताने आपल्या अनोख्या अंदाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या अभिनेत्रीची कारकिर्द फार मोठी नसली तरीही या कारकिर्दीतूनच तिने चित्रपटसृष्टीत स्वत:ची ओळख मिळवली होती.

बबिता शिवदासानी म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री लग्नानंतर बबिता कपूर झाली. अभिनेता रणधीर कपूरशी लग्न करून तिने कपूर कुटुंबात प्रवेश केला. बबिताभोवती चाहत्यांचं वलय असतानाही या अभिनेत्रीने लग्न झाल्यानंतर चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला. चित्रपटसृष्टीमध्ये नावारुपास येत असतानाच बबिता आणि रणधीर कपूर एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर रणधीर यांच्या प्रेमापोटीच या अभिनेत्रीने चित्रपटांमध्ये काम करणं बंद केलं.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

परंपरेनुसार कपूर कुटुंबात त्या काळी स्त्रियांनी लग्नानंतर काम करुन नये असा अलिखित नियमच होता. त्यामुळे बबितालाही याच नियमाचं पालन करावं लागलं. चित्रपटसृष्टीपासून वेगळं झाल्यानंतर बबिता यांनी कुटुंबाकडेच पूर्ण लक्ष दिलं. आपल्या जवळच्या व्यक्तीच्या प्रेमापोटी बबिताने चित्रपटसृष्टीला अलविदा केलं पण, रणधीरसोबतचं त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या नात्याला तडा गेला आणि दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. विभक्त झाल्यानंतर बबिता यांनी करिना आणि करिश्माचं संगोपन केलं. त्या दोघींनीही चित्रपटसृष्टीत प्रसिद्धी मिळवली. गेल्या काही वर्षांपासून बबिता आणि रणधीर कपूर पुन्हा एकत्र आल्याचंही म्हटलं जातंय.

वाचा : … म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या