चित्रपटसृष्टीमध्ये जितका झगमगाट दिसतो, जितका या अनोख्या विश्वाचा आपल्याला हेवा वाटतो तितकेच वादही या क्षेत्रात पाहायला मिळतात. बऱ्याचदा हे वाद सर्वांसमोर येत नाहीत. पण, कालांतराने हे वाद जेव्हा साऱ्यांनाच कळतात तेव्हा अनेकांच्याच भुवया उंचावतात. अशाच काही बहुचर्चित वादांपैकी एक म्हणजे अभिनेत्री वैजयंतीमाला आणि फिल्मफेअर पुरस्काराचा किस्सा. १९५५ बिमल रॉय दिग्दर्शित 'देवदास' या चित्रपटातून वैजयंतीमाला, सुचित्रा सेन आणि अभिनेते दिलीप कुमार प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या चित्रपटामध्ये वैजयंतीमाला यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यांना फिल्मफेअरतर्फे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहिर झाला. पण, त्यांनी हा पुरस्कार घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. 'द्यायचा असेल तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार द्या सहाय्यक अभिनेत्रीचा नको,' असं म्हणत त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता. वाचा : . आणि त्या प्रसंगानंतर राखी-गुलजार यांच्यातील नात्याचं समीकरणच बदललं वैजयंती माला यांच्या मते, ''देवदास'च्या आयुष्यात 'पारो'चं जितकं महत्त्वं होतं तितकच महत्त्व 'चंद्रमुखी'चंही होतं. त्यामुळे 'देवदास' या चित्रपटामध्ये असणारी आपली भूमिका सहाय्यक अभिनेत्रीची नव्हतीच याच मतावर त्या ठाम होत्या. या चित्रपटामध्ये त्यांच्या नृत्यकौशल्याचीही झलक पाहायला मिळाली होती. वैजयंतीमाला यांनी फिल्मफेअर पुरस्कार नाकारला तेव्हा त्याची बरीच चर्चा चित्रपट वर्तुळात रंगली होती. बरीच दशकं आपल्या सौंदर्याने, अभिनय कौशल्याने वैजयंतीमाला यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. 'देवदास'साठी त्यांनी फिल्मफेअर नाकारला असला तरीही, त्यांना 'साधना', 'गंगा जमुना' आणि 'संग'म या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या खासगी आयुष्याविषयीही बऱ्याच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. ५० आणि ६० च्या दशकात, काही सहकलाकारांसोबतही त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. त्यातीलच एक नाव होतं 'शो मॅन', अभिनेता राज कपूर यांचं. आपल्या खासगी जीवनाविषयी होणाऱ्या या सर्व चर्चांना वैजयंतीमाला यांनी कधीच दुजोरा दिला नाही.