‘रोडीज्’ फेम रघु राम आणि अभिनेत्री सुगंधा यांनी काही दिवसांपूर्वी ते विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. याविषयी भाष्य करताना रघुने मी माझी बायको गमावली असली तरी मला मैत्रीण परत मिळाली असल्याची भावना व्यक्त केली. आम्ही आता पती-पत्नी राहिलेलो नाही. मी माझी बायको गमावली असली तरी मला माझी मैत्रीण परत मिळाली आहे आणि त्यासाठी मी खूप आनंदी आहे, अशा आशायाचे ट्विट रघुने केले. लग्नाला १० वर्ष उलटल्यानंतर या जोडप्याने स्वखुशीने वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. लग्नाआधीदेखील बराच काळ या दोघांमध्ये डेटिंग सुरू होते.
काही दिवसांपूर्वी रघु आणि सुगंधा एकमेकांपासून विभक्त होणार असल्याची माहिती समोर आली होती. स्वत: सुगंधान या बातमीला दुजोरा दिला होता. या दोघांमध्ये विभक्त होण्याविषयी कोणतेही मतभेद नसून ते समन्वयाने वेगळे होत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली होती. रघु आणि सुगंधाला कामामुळे एकमेकांना पुरेसा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे एकमेकांपासून विभक्त होणे हा त्यांना योग्य पर्याय वाटला. विभक्त होण्यामागे अजून वेगळे काही कारण आहे का? असे सुगंधाला विचारले असता तिने अधिक काही बोलायचे टाळले होते.