लव्ह लग्न लोचा … ज्या मालिकेच्या नावातच लोचा आहे, तिथे लोचा होणे काही नवीन नाही. मैत्रीतून होणारं प्रेम, लग्नातील मज्जा आणि या सगळ्यांतून होणारे लोचे हे आज प्रत्येकाच्या आयुष्यातील एक भाग आहेत. झी युवाच्या या फ्रेश मालिकेला प्रेक्षक उत्तम प्रतिसाद देत आहेत. या मालिकेने बच्चे पार्टीपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला आपलेसे केलं.  मैत्रीचे वेगवेगळे रंग दाखवणारी ही मालिका सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात आणि गावात आवडीने पहिली जाते. यातील राघव, सौम्या, अभिमान, सुमीत, विनय, काव्या, आकांशा आणि खळखळून हसणारी शाल्मली ही मित्रमंडळी आज सगळ्यांची झाली आहेत. पण या मालिकेमध्ये एक मोठा लोचा होणार आहे.

या टीम ला आता बेघर व्हावे लागणार आहे. त्याचं काय झालंय विनय राघव आणि सुमित हे गेली अनेक वर्षे माने कुटुंबियांच्या फ्लॅटमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहतात हे आपल्याला माहितच आहे . माने कुटूंबसुद्धा त्यांना अगदी मुलासारखे सांभाळतात, त्यांच्यावर प्रेम करतात. पण हेच माने कुटूंबियांच्या खऱ्या मुलाला खुपले. एक तर तो अनेक वर्षे अमेरिकेत होता. स्वभावानेच अहंकारी, तिरसट असलेला श्रीकांत म्हणजेच समीर खांडेकर. आता तिरस्काराने पेटला आहे. त्यामुळे माने काकूंना तो पटवून देतोय की ही विनय, सुमित आणि राघवची गॅंग कशी चुकीची आहे. तसेच, तो आता त्यांना घराबाहेरही काढणार आहे. पण त्यानंतर काय ? श्रीकांत खरंच असे करू शकेल ? विनय, सुमित आणि राघव कुठे जाणार ? या लोच्याच नक्की काय होणार ते तुम्हाला ‘लव्ह लग्न लोचा’ मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये कळेलच.