चित्रपट, नाटक, मालिका या तीनही क्षेत्रांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारी अभिनेत्री आणि भरतनाटय़म् नृत्यांगना अश्विनी एकबोटे (४४) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी निधन झाले. त्यांच्यामागे पती आणि मुलगा असा परिवार आहे. सहज संस्थेतर्फे ‘नाटय़ त्रिविधा’ या कार्यक्रमाचा भरत नाटय़ मंदिर येथे सायंकाळी शुभारंभाचा प्रयोग होता. या कार्यक्रमात अश्विनी एकबोटे यांनी काही गीतांवर नृत्य सादर केले होते. शेवटी त्या ‘संगीत बावनखणी’ नाटकाच्या भैरवीवर नृत्य करण्यासाठी रंगमंचावर आल्या. प्रसिद्ध गायिका रेवा नातू आणि चिन्मय जोगळेकर यांनी नाटय़गीत सादर केले. त्यावर नृत्य करीत असताना तिहाई घेतल्यावर अश्विनी रंगमंचावर कोसळल्या. त्यांना तातडीने पेरुगेटजवळील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. उपचार सुरू असतानाच नऊच्या सुमारास त्यांचे निधन झाले. अश्विनी एकबोटे या पूर्वाश्रमीच्या अश्विनी काटकर. जागर संस्थेच्या माध्यमातून त्यांनी बालवयातच रंगभूमीवर पाऊल ठेवले. ‘नंदनवन’ या नाटकात बालवयातील अश्विनी यांनी काम केले होते. बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बी. कॉम पदवी संपादन करीत असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतून त्यांनी अभिनय केला होता. ‘एका क्षणात’, ‘त्या तिघांची गोष्ट’ या नाटकांमध्ये भूमिका करणाऱ्या अश्विनी एकबोटे या सध्या ‘संगीत बावनखणी’ नाटकामध्ये काम करीत होत्या. ‘महागुरू’, ‘बावरे हे प्रेम’, ‘डेबू’, ‘दणक्यावर दणका’, ‘हायकमांड’, ‘क्षण मोहाचा’, ‘आरंभ’, ‘तप्तपदी’, ‘तू भेटशी नव्याने’ या मराठी चित्रपटांसह त्यांनी ‘एक पल प्यार का’ या हिंदूी चित्रपटातून भूमिका केली होती. ‘भोभो’ हा प्रशांत दामले यांच्यासमवेत त्यांचा अखेरचा चित्रपट ठरला. ‘कशाला उद्याची बात’, ‘राधा ही बावरी’, ‘आईसाहेब’ या मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते.