दूरचित्रवाहिन्यांवरील मराठी मनोरंजन विश्वात सध्या नायक व नायिकेच्या मधुचंद्राच्या निमित्ताने पर्यटन स्थळांचे दर्शन घडविण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. आधी स्वीत्र्झलड, नंतर दुबई आणि आता मनालीचे दर्शन प्रेक्षकांना घरबसल्या घडणार आहे. दूरचित्रवाहिन्यांवरील मराठी मालिका गेल्या काही वर्षांत स्टुडिओतून बाहेर पडल्या आणि वेगवेगळ्या स्थळांवर मालिकांचे चित्रीकरण होऊ लागले. ठरावीक साच्यात अडकलेल्या मराठी मालिका ‘बाहेर’ पडल्यामुळे मालिकांमध्येही एक ताजेपणा आला. मात्र एका मालिकेत विशिष्ट कथानक सुरू झाल्यानंतर आता सर्वच मराठी मालिका त्या मार्गावर चालल्या आहेत. ‘काहे दिया परदेस’, ‘सरस्वती’ आणि आता ‘नकुशी’ मालिकेने स्टुडिओबाहेर पाऊल टाकले असून प्रेक्षकांना पर्यटन स्थळांचे दर्शन घडविण्यात येत आहे. ‘काहे दिया परदेस’ आणि ‘सरस्वती’ मालिकेने तर सातासमुद्रापार झेंडा फडकाविला. झी मराठीवरील ‘का हे दिया परदेस’ या मालिकेत प्रेक्षकांना अलीकडेच स्वीत्र्झलडचे दर्शन घडले होते. मालिकेतील शीव आणि गौरी मधुचंद्रासाठी स्वीत्र्झलडला जातात, असा कथाभाग मालिकेत दाखविण्यात आला होता आणि त्यामुळे काही भागांचे चित्रीकरण तिकडे झाले होते. कलर्स मराठी वरील ‘सरस्वती’ मालिकेत प्रेक्षकांना सध्या दुबईवारी घडविण्यात येत आहे. लग्नानंतर ‘सरस्वती’ मालिकेतील ‘सुरु’ आणि ‘राघव’ पहिल्यांदाच एकत्र आणि तेही परदेशी गेले आहेत, असे कथानकाने वळण घेतले आहे. ते दुबईला गेले असून मालिकेच्या या काही भागात ‘सरु’चे वेगळेरूप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. येत्या २५ मार्चपर्यंत ही दुबईवारी प्रेक्षकांना पाहाता येणार आहे. आणि आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नकुशी’ ही मालिका प्रेक्षकांना मनालीचे दर्शन घडवणार आहे. कार्यालयीन कामानिमित्त ‘रणजित’ला बायकोला सोबत घेऊन मनालीला जायची संधी मिळते. त्यामुळे रणजित आणि नकुशी मनालीला जाणार असे वळण कथानकाने घेतले आहे. सोलंग व्हॅली, पंडोह पूल, हिडिंबा मंदिर, ग्लेशियर रेस्टॉरंट, ब्यास नदी आदी ठिकाणे प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळणार आहेत.