आज सुप्रीम कोर्टाने तिहेरी तलाकवर दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वच स्थरांवर स्वागत केले जात आहे. या निर्णयाने आता मुस्लिम महिलांना समानतेचा हक्क दिला गेला असेच काहीसे भाव प्रत्येकाच्या मनात आहेत. आतापर्यंत तिहेरी तलाकला अनेक मुस्लिम महिला बळी पडल्या आहेत. मात्र, यापुढे असे होऊ नये याची खबरदारी सरकारकडून घेण्यात आली आहे. या तिहेरी तलाकच्या बळी फक्त सर्वसामान्य महिलाच होत्या असे नाही तर सुपरस्टार मीना कुमारी यांनाही याचा सामना करावा लागला होता.

बॉलिवूडचे टॉप १० सेल्फी

बॉलिवूडची ‘ट्रेजेडी क्वीन’ अशी ओळख असलेल्या मीना कुमारी यांच्या जीवनातील सर्वात दुःखद घटना होती ती म्हणजे त्यांचा घटस्फोट. कारण मीना कुमारी यांना त्यांचे पती कमाल अमरोही यांनी रागात येऊन तिहेरी तलाक दिला होता. नंतर कमाल यांना आपण केलेल्या कृतीवर पश्चाताप होता. पण तोवर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. कमाल यांनी पुन्हा एकदा मीना कुमारी यांच्याशी लग्न करण्याचा प्रयत्न केला पण धर्मगुरूंनी दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केल्याशिवाय पहिल्या नवऱ्याकडे परत येता येणार नसल्याचे सांगितले. यासाठी मीना कुमारी यांना झिनत अमानचे वडील अमान उल्ला खान यांच्याशी विवाह करावा लागला.

एवढंच नाही तर मीना कुमारी यांना ‘इद्दत’ म्हणजे मासिक पाळी आल्यानंतर आपल्या दुसऱ्या नवऱ्याला तलाक देऊन पहिल्या नवऱ्यासोबत म्हणजे कमाल अमरोही यांच्यासोबत पुन्हा लग्न करावे लागले होते. मीना कुमारी यांनी आपल्यासोबत घडलेल्या या घटनेवर भाष्य करताना एकदा म्हटले होते की, ‘जर मला धर्मासाठी आपले शरीर दुसऱ्या व्यक्तीला द्यावे लागत असेल तर माझ्यात आणि देहविक्री करणाऱ्या त्या स्त्रियांमध्ये काय फरक राहिला?’