नटसम्राट’च्या माध्यमांतराची गोष्ट

‘नटसम्राट’ हे नाटक चित्रपट स्वरूपात रुपेरी पडद्यावर येतं आहे, हे कानी पडताच एकच खळबळ उडाली होती. मराठी रंगभूमीवरील अभिजात कलाकृती असणाऱ्या वि. वा. शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक आधीच्या दोन पिढय़ांनी सातत्याने पाहिलं आहे, ते स्वत:त रुजवलं आहे. त्यालाही एक काळ लोटला आहे. आताच्या तरुण पिढीला हे नाटक माहिती आहे. पण बऱ्याच जणांनी ते दूरदर्शनवर पाहिलं आहे तर नव्या पिढीच्या येणाऱ्या लाटेला हे नाटक पहिल्यांदा चित्रपट रूपातच भेटणार आहे. एका अभिजात कलाकृतीचे माध्यमांतर होत असताना त्याचे जनमानसावर उमटणारे पडसाद हे असेच भिन्न असणार आहेत. आणि हे लक्षात घेऊनच दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर यांनी या माध्यमांतराला सुरुवात केली. या प्रवासात मग ‘नटसम्राट’ म्हणून नाना पाटेकरांसारखा अभिनेता या चित्रपटाशी जोडला गेला. महेश मांजरेकरांचे दिग्दर्शन, नाना आणि विक्रम गोखलेंसारख्या दिग्गज नटांची जुगलबंदी आणि मुळात कुसुमाग्रजांच्या लेखणीतून उतरलेलं हे जबरदस्त नाटय़ या सगळ्याचा एक वेगळाच आविष्कार सेल्युलॉइडवर नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळणार आहे. मात्र नाटय़कृती ते चित्रपटापर्यंत पोहोचण्याचा पडद्यामागचा हा रंगतदार प्रवास कसा होता, याचा गप्पांचा प्रयोग खुद्द महेश मांजरेकर, नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, सुनील बर्वे, निर्माता विश्वास जोशी आणि ‘झी स्टुडिओ’चे निखिल साने यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयात येऊन रंगवला.

shehzad-khan-speaks-about-ajit
“माझे वडील गटारात झोपायचे…”, बॉलिवूडचा कपटी खलनायक अजित यांच्या मुलाचा मोठा खुलासा
marathi actress Amruta Subhash and sandesh kulkarni Love story Entdc
पहिल्या भेटीतलं प्रेम, १७व्या वर्षी लग्नाची मागणी अन् मूल होऊ न देण्याचा निर्णय; वाचा अमृता सुभाषची फिल्मी लव्हस्टोरी
sanjay-dutt-salman-khan
जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या
aamir-khan2
ठरलं! ‘या’ चित्रपटातून आमिर खान करणार दमदार कमबॅक; प्रदर्शनाबद्दल मिस्टर परफेक्शनिस्टचा खुलासा

गाजलेल्या नाटकाचा ‘चित्र’प्रयोग का?

नाटक आणि चित्रपट ही दोन वेगवेगळी माध्यमं आहेत. नाटक पाहताना त्यात काहीतरी चित्रपटातून मांडण्यासारखं सापडतं. जे ‘नटसम्राट’च्या बाबतीत महेश मांजरेकरला सापडलं. पण नाटकातील कथावस्तू चित्रपट माध्यमात आणताना तिथे दिसणारे आठ-दहा प्रसंग इथे शंभर प्रसंगात मांडणं एवढा मर्यादित अर्थ नसतो. तुम्हाला त्या कथेत काहीतरी वेगळं जाणवावं लागतं. महेशने ते अप्पासाहेबांच्या मित्राच्या रामभाऊच्या रूपाने आणलं. तो मित्र नेहमी अप्पासाहेबांना सांगत असतो, अरे तु कसला नटसम्राट? खरा नटसम्राट तर मी आहे. ही ईर्षां आहे त्या दोन मित्रांमध्ये.. प्रत्येक नटाला आपण दुसऱ्यापेक्षा चांगलं करावं ही ईर्षां असतेच. त्या दोघांमध्ये हे जे नातं आहे त्याने या चित्रपटाला धार आणली आहे. नाहीतर नाटकातील सगळ्या व्यक्तिरेखा म्हणजे खुद्द अप्पासाहेब आणि त्यांची पत्नी कावेरी यांच्यासह एकतर काळे किंवा पांढऱ्या स्वभावाचे दाखवलेले आहेत. प्रत्यक्षात आपण तसे काळे किंवा पांढरे असे नसतो. तुझ्या ठायी काही चांगलं असतं तर माझ्या ठायी काही वाईट असतं.

‘टु बी ऑर नॉट टु बी’ चा वेगळा अन्वयार्थ

तात्यासाहेबांची कविता काळाच्या ओघात बदलत गेली. घट्ट वृत्तछंदात बांधलेली तात्यासाहेबांची कविता मुक्तछंदाकडे कधी वळली ते कळलंच नाही आणि मग त्यात फक्त आशय होते. आणि त्याचे संदर्भ हे काळानुरूप बदलणारे आहेत. म्हणजे ‘टु बी ऑर नॉट टु बी’.. जगावं की मरावं हा एकच सवाल आहे. प्रश्न आता शेतक ऱ्यांना पडू शकतो. ‘‘एकेकाळचा राजा या दुनियेच्या उकिरडय़ावर खरकटय़ा पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम, लाचार, आनंदानं की फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या गुंडाळल्या यातनांच्या जाणिवेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये.. आणि करावा शेवट या सगळ्याचा माझा, तुझा, याचा आणि त्याचाही..’’ या स्वगतात जे मांडलं आहे ते आजच्या शेतक ऱ्यांच्या व्यथेशी जोडून घेणारं आहे.

‘‘नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण (जुन्या आमच्या प्रथा-परंपरा), सहन करतो प्रेताच्या निर्जीवतेने अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या स्वत्वाची विटंबना आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेक ऱ्यांच्या दाराशी (राजकारण्यांच्या दाराशी) विधात्या तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला (पुन्हा राजकारणी) ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला जन्म दिला तो तू बरसत नाहीस, आम्हाला विसरतोस, म्हणून विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणाकरा आम्ही थेरडय़ांनी कोणाच्या पायावर डोकं आपटायचं?’’  हे साधम्र्य मला आता जाणवतं. तेव्हा चित्रीकरणावेळी ते जाणवलं नाही. पण, साहित्याचे अन्वयार्थ हे बदलत जातात. तुमचा दृष्टिकोन बदलत गेला की शब्दाचे अन्वयार्थही बदलत जातात.

रंगमंचावर ‘नटसम्राट’ साकारणं वयामुळे अवघड ठरेल

‘नटसम्राट’ हे नाटक मला आवडून गेलं त्याला कारण डॉ. लागूंनी आणि दत्ता भटांसारख्या नटांनी ते अजरामर करून ठेवलं हे एक आहे. पण या नाटकातील भाषा मला जास्त भावली. ‘नटसम्राट’ हे महाकाव्यासारखे आहे. ते कधीही वाचायला घ्या तुम्हाला कंटाळा येत नाही. माझ्यावर या नाटकातील भाषेचा खूप प्रभाव आहे. गेली अनेक वर्षे या भाषेने माझ्यावर गारुड केले आहे. अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका अभिनेता म्हणून प्रत्येकाला दंश करणारी आहे. त्यातली लांबच्या लांब काव्यात्मक स्वगतं, पल्लेदार संवाद म्हणजे रंगमंचावर ही भूमिका करताना नटाला त्यात सर्वच अंगांनी गुंतून राहावे लागते. मला स्वत:ला दत्ता भट व श्रीराम लागूंनी केलेली भूमिका आवडली होती. मात्र, नट म्हणून आता ही भूमिका रंगभूमीवर करण्यासाठी वयामुळे मर्यादा आल्या असत्या त्यामुळे चित्रपट माध्यमातून ‘नटसम्राट’ साकारणं हे आताच्या वेळेला योग्य ठरलं आहे.

नानांचा हिंदी चित्रपट 

सध्या आपल्या आजूबाजूला धार्मिक कट्टरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांचा परस्परांवरचा विश्वास उडू लागला आहे. चित्रपट सृष्टी हे क्षेत्र धार्मिक बाबतीत सर्वात सहिष्णू आहे, पण सध्या हे चित्र बदलताना दिसतं आहे. नटांच्या चेहऱ्याला किंमत असते, त्यांचा जनमानसावर प्रभाव असतो, त्यामुळे ते जे काही बोलतील तशी मतं पसरायला सुरुवात होते. अभिनेत्यांनी आपली मतं मांडताना सामाजिक भान बाळगायला हवं. माझ्याकडे असलेल्या वेळात उपलब्ध माध्यमातून मला समाजासाठी जे काही द्यायचं ते द्यायला हवं. आजूबाजूला असणारी धार्मिक तेढ पाहता यावर पटकथा लिहिण्याचा विचार आहे. त्याचा हिंदीत चित्रपट करण्याचा विचार आहे.

नाना आणि महेश यांची जुगलबंदी

मी आणि महेश एकत्र काम करतोय, त्यामुळे हा चित्रपट पूर्णत्वाला जाईल का याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. पण आमच्या दोघांमधले ‘टय़ुनिंग’ खूप छान होते.  दोघेही आपापल्या कामात दंग होतो, त्यामुळे भांडणासाठी वेळच मिळाला नाही. चित्रपट करताना सर्वाना आपापली जबाबदारी नेमकी माहीत होती आणि ती प्रत्येकाने सुंदरपणे निभावली आहे. त्यामुळेच ६५ दिवसांचे चित्रीकरण आम्ही ३५ दिवसांत पूर्ण करू शकलो, असं नाना पाटेकर यांनी सांगितलं. तर एकीक डे नाना आणि दुसरीकडे पत्नी मेधा मांजरेकर या दोघांना सांभाळताना कराव्या लागलेल्या कसरतींचे गमतीशीर किस्से महेश मांजरेकर यांनी ऐकवले.\

नाटक ते चित्रपट अनवट प्रवास

मी जेव्हा नाटक वाचलं तेव्हा खूप प्रभावित झालो होतो. मला एक समान धागा सापडला होता कथेत तो म्हणजे एक जळलेलं नाटय़गृह आणि एक उतरतीला लागलेला नटसम्राट. या दोन गोष्टी जेव्हा सापडल्या तेव्हा मी नाटक लिहायला सुरुवात केली कारण जोपर्यंत मला कथा दिसत नाही तोपर्यंत मी लिहीत नाही. तेव्हा सलग अठरा सीन लिहून काढले आणि नंतर ते पुढे जाईचना. मी वर्षभर थांबलो. तेव्हा मग मला मित्राचं विक्रम गोखलेंचं पात्र मिळालं. पुन्हा लिहीत गेलो. जेव्हा कथा लिहून पूर्ण झाली तेव्हा जाणवलं की आजवरच्या कारकीर्दीतली ही सगळ्यात अवघड पटकथा होती. ‘तुम्ही नाटक सोडलं नाही ते घरी घेऊन आलात,’ या ओळीने हे नाटक समजून घ्यायला मला खूप मदत केली. कारण नाहीतर सगळाच गोंधळ होता. म्हणजे या नाटकात सगळे काळे-पांढरे होते. माझ्या दृष्टीने या नाटकातील मुलांच्या व्यक्तिरेखा वाईट नाहीत. त्यांना आपल्या वडिलांचा स्वभाव माहीत होता त्यामुळे त्यांचं वागणं हे त्यांच्या दृष्टीने योग्य होतं, अशी भूमिका मी घेतली आहे. जी मूळ नाटकात नाही. बरेचसे संवाद, स्वगतं या चित्रपटात कायम आहेत कारण त्यात बदल शक्य नव्हते. त्यामुळे या नाटकाची मूळ संहिता तीच राहिली आहे, मात्र त्यात काही भर घालण्यात आली आहे. चित्रपटाच्या पटकथेच्या दृष्टीने नाटकातील दोन स्वगते कापावी लागली आहेत. पण मूळ संहितेच्या भक्कम पायावरच चित्रपटाची पटकथा रचण्यात आली आहे. मूळ संहितेतील विठोबा हे पात्र  चित्रपटातही ठेवण्यात आले असले तरी त्याचे व्यक्तीचित्रण निराळ्या पद्धतीने करण्यात आले आहे. आजच्या पिढीने हे नाटक पाहिले नसले तरी या पिढीला चित्रपट माध्यम कळते. त्यामुळे त्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल.

महेश मांजरेकर

‘नटसम्राट’मधील कावेरीची भूमिका अत्यंत वेगळी

महेशच्या दिग्दर्शनाखाली मी केलेला हा चौथा चित्रपट आहे. मी या चित्रपटात कावेरीची भूमिका करत आहे. माझ्यासाठी आतापर्यंतच्या भूमिकांमधील ही भूमिका अत्यंत वेगळी आहे. चित्रीकरणाच्या वेळी महेश मला भूमिकेविषयी समजावताना कधीकधी रागवायचा, तेव्हा खूप चिडचिड व्हायची. पण त्याने नंतर सगळं नीट समजावून सांगितल्यानंतर ते मला पटलं. आणि एका अर्थाने त्याच्या या ओरडण्याचा अभिनयाच्या दृष्टीने पाहता मला फायदाच झाला आहे. नानांबरोबर काम करताना सुरुवातीला दडपण आले होते, पण त्यांनी खूप सांभाळून घेतलं.

मेधा मांजरेकर

गेली दोन वर्षे मी या चित्रपटासाठी महेश मांजरेकरांबरोबर जोडला गेलो आहे. निर्माता म्हणून माझा हा पहिलाच चित्रपट आहे. मांजरेकरांच्या डोळ्यांसमोर संपूर्ण चित्रपट तयार असायचा, त्यामुळे या चित्रपटाचं बजेट जास्त असलं तरी कुठेतरी तो फसेल ही भीती नव्हती. उलट, हा चित्रपट निर्माता म्हणून मला कलात्मक आनंद देऊन गेला आहे. प्रेक्षकांनाही तो नक्कीच आवडेल, यात कोणतीही शंका नाही.

विश्वास जोशी, निर्माते

‘झी स्टुडिओ’चा महेश मांजरेकरांबरोबरचा हा तिसरा चित्रपट आहे. याआधी ‘दे धक्का’ व ‘काकस्पर्श’ हे चित्रपट ‘झी’ने केले आहेत. गेल्या काही वर्षांत सकस मराठी चित्रपट येऊ लागले आहेत. पूर्वी मराठी चित्रपटांवर कोल्हापूरचा फारच प्रभाव होता पण, सध्या मुंबईच्या मानसिकतेतील चित्रपट येऊ लागले आहेत आणि त्याही चित्रपटांना सगळीकडून चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ‘नटसम्राट’ हा चित्रपटही प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारा असेल.

निखिल साने, ‘झी स्टुडिओ’