‘प्रेम’ हा मध्यबिंदू ठेवून त्याभोवती रचलेल्या कथेला एक वेगळेपण असते. कारण प्रेम हा प्रत्येकाच्या मनाचा हळवा कोपरा असतो. कुणी त्यात आकंठ बुडालेला असतो, तर कुणी त्याच्या चाहुलीने मोहरलेला असतो. कुणाला त्याचे चटकेही बसलेले असतात, तर कुणी त्यावर तरंगत असतो.. पण याच प्रेमभावनेकडे पाहण्याची एक वेगळी नजर देणारा एक नवा चित्रपट सध्या मराठीतील रुपेरी पडद्यावर दिमाखाने
झळकतोय.
केवळ प्रेमी-प्रेमिकांमधील प्रेम एवढाच प्रेमाचा मर्यादित अर्थ नाही. प्रेमाला असंख्य मिती असतात, आणि अनेक कंगोरेही असतात. आईचं मुलांवरचं, वडिलांचं मुलांवरचं प्रेमदेखील प्रेमच असतं, आणि तेही अनेक हळव्या पाकळ्यांनी गुंफलेलं असतं.. मनीष राम कुलकर्णी याच्या संवादातून नटलेल्या ‘बेदर्दी’ या मराठी चित्रपटात वडील आणि मुलाच्या प्रेमाची आगळी कहाणी पडद्यावर फुलत जाते, आणि प्रेक्षकांमधला कुणी स्वतला बापाच्या जागी पाहात, तर कुणी स्वतला मुलाच्या जागी पाहात हळवा होऊन जातो..
‘बेदर्दी’ची कथा निर्माता सुरेश भगत यांची आहे. मूळ कथा हिंदीत असल्याने, मनीष कुलकर्णी यांनी पटकथा लिहिताना आणि चित्रपट बनवतानाही कथानकाचे नाव बदललेले नाही.
‘झेप घे रे पाखरा’ या त्यांनीच लिहिलेल्या चित्रपटात त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. एका माजी केंद्रीय मंत्र्याच्या जीवनावर बेतलेला हा चित्रपट पूर्ण होऊनही पडद्यावर मात्र झळकलाच नाही. ‘गं.भा. सौभाग्यवती’ हा मनीष कुलकर्णीचा एक चित्रपटही येणार आहे. बेदर्दीच्या यशामुळे आपली उमेद बळावली असून मराठी प्रेक्षक चांगल्या चित्रपटांना भक्कम आधार देतो हा आपला विश्वासही वाढला आहे, अशी प्रतिक्रिया ‘बेदर्दी’च्या पहिल्या आठवडय़ानंतरच्या प्रतिसादावर मनीष कुलकर्णी यांनी व्यक्त केली.