नव्या जोडय़ा घेऊन सिनेमा करणे हा बॉलीवूडमध्ये होत असलेल्या विविध प्रयोगांपैकी एक प्रयोग. या वर्षी नव्या जोडय़ांचे अनेक सिनेमे येताहेत. पण, या नव्या कोऱ्या जोडय़ा बॉक्स ऑफीस आणि प्रेक्षकांच्या मनावर किती राज्य करताहेत हे लवकरच समजेल.

हिंदी सिनेमांची स्पर्धा दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. इतरांपेक्षा आपण काय वेगळं करू शकतो यावर बॉलीवूडकर्त्यांचा विशेष कल असतो. म्हणूनच कोणीही कितीही नाकारलं तरी इतर सिनेमांमध्ये काय चाललंय याकडे त्यांचं बारीक लक्ष असतंच. एखाद्याने आयटम साँग केलं तर दुसरा अनुकरण करणार. दुसऱ्या कोणी स्टंटबाजी केली तर तिसराही थोडेफार बदल करून असंच काहीसं करणार. सिनेमाचं वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी विविध कल्पना आजमावल्या जातात. पण, प्रत्येक वेळी त्या यशस्वी होतातच असं नाही. अशांपैकी एक ताजी कल्पना म्हणजे सिनेमामध्ये नवीन जोडय़ा घेणे. नवीन म्हणजे ज्या नायक-नायिकांनी कधीच एकत्र काम केलं नाही अशा जोडय़ा. हा फंडा गेल्यावर्षीही प्रेक्षकांना दिसला होता. पण तो फारसा यशस्वी झाला नाही. याही वर्षी अशाच काही नव्या जोडय़ांचे सिनेमे येताहेत.

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘एअरलिफ्ट’ या सिनेमात अक्षय कुमार आणि निम्रत कौर हे दोघे आहेत. हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधारित आहे. सत्य घटना आणि रहस्य अशा बाजाच्या सिनेमांमध्ये अक्षय कुमारने याआधी अनेकदा भूमिका केल्या आहेत. त्यामुळे त्याला अशा प्रकारच्या सिनेमात पुन्हा बघणं प्रेक्षकांसाठी मेजवानी ठरतेय. तर, निम्रत कौर ही अभिनेत्री विविध जाहिरातींमधून दिसते. शिवाय ‘द लंच बॉक्स’ या अप्रतिम सिनेमातही ती होती. या दोन्ही कलाकारांनी आपापल्या करिअरमध्ये विशिष्ट उंची प्राप्त केलेली आहे. त्यामुळे दोघांना एकत्र बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता होती. दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेंजोदाडो’ हा बहुचर्चित सिनेमा या वर्षी प्रदर्शित होतोय. हृतिक रोशनसोबत पूजा हेगडे ही नवी नायिका दिसणार आहे. हिने याआधी तमीळ, तेलुगु सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘मोहेंजोदाडो’हा तिचा हिंदीतला पहिला सिनेमा असेल. या सिनेमाची घोषणा होऊन बरेच महिने झाले. आशुतोष गोवारीकर सिनेमा करत असल्यामुळे त्याविषयीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पण, या नव्या जोडीला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील हे लवकरच कळेल.

बॉलीवूडमध्ये विशिष्ट काळात विशिष्ट प्रवाह येत असतात. एक ट्रेंड लोकप्रिय झाला की त्याचंच अनुकरण केलं जातं. मध्यंतरी आयटम साँगचा ट्रेंड जोरात सुरू होता. सिनेमात एक तरी आयटम साँग असलंच पाहिजे असा जणू नियमच केला होता. आयटम साँग नसेल तर सिनेमाच्या बाजावरून एखादा मुजरा, लावणी, कॅब्रे असं काहीसं गाणं असायचंच. हळूहळू तो ट्रेंड इंडस्ट्रीत रुजला आणि त्यातलं नावीन्य कमी होत गेलं. मग ट्रेंड आला तो कॅमिओचा. म्हणजे एखाद्या बडय़ा कलाकाराला पाहुणा कलाकार म्हणून सिनेमात दाखवलं जायचं. मग तेही सगळेच करू लागल्यामुळे सिनेमावाले आपापली वेगळी वाट शोधू लागले. पण एकाने एक गोष्ट नवी केली की दुसरा त्याचं अनुकरण करतोच हे तिथल्या सगळ्यांच्याच लक्षात आलं. मग या स्पर्धेची तीव्रता काहीशी कमी झाली. पण नवनवीन गोष्टी आजमवण्यामध्ये सध्या प्रकर्षांने जाणवतेय ती नव्या चेहऱ्यांची गर्दी. वर्षांगणिक येणाऱ्या सिनेमांमध्ये नवे चेहरे बघण्याची सवय कालांतराने प्रेक्षकांनाही झाली. तरी हा ट्रेंड आजही सुरूच आहे. किंबहुना त्याची व्याप्ती वाढली आहे. बडय़ा कलाकारांची मुलं, भावंडं असे अनेक जण मैदानात उतरताहेत. काहींची दखल घेतली जातेय, काहींना घरचा रस्ता दाखवला जातोय तर काही हळूहळू जम बसवताहेत. आता या नवीन चेहऱ्यांमुळे बॉलीवूडला नव्या जोडय़ा मिळू लागल्या आहेत. याचाच उपयोग करत नव्या जोडय़ांचा प्रयोग केला जातोय.

धनुष या दाक्षिणात्य नायकाने हिंदी सिनेसृष्टीत चांगलं नाव कमवलं. आत्तापर्यंत त्याने ‘रांझना’, ‘शमिताभ’ हे दोनच सिनेमे केले असले तरी प्रेक्षकांच्या ते पसंतीस उतरले होते. त्यामुळे त्याचा पुढचा सिनेमा कोणता याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये नक्कीच आहे. ‘ढाई अक्षर तेरे नाम के’ या नव्या सिनेमात तो झळकणार आहे श्रद्धा कपूरसोबत. श्रद्धा कपूरनेही मोजक्या सिनेमांतून लोकप्रियता मिळवली आहे. दोघांना एकत्र एका सिनेमात बघणं सिनेप्रेमींसाठी खुशखबर आहे. ही आगळीवेगळी जोडी या सिनेमातून कुठवर पसंती मिळवेल हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. श्रद्धा कपूर आणखी एका नायकासोबत पहिल्यांदा सिनेमात काम करणार आहे. तो सिनेमा म्हणजे ‘बाघी’. यात तिच्यासोबत असणार आहे टायगर श्रॉफ. टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती’ फार गाजला नसला तरी त्याची दखल घेतली गेली. त्याच्या अभिनय आणि दिसण्यावर टीका होतानाच त्याच्या नृत्याचं आणि त्याच्या अ‍ॅक्शन सीन्सचं कौतुक झालं. पण, आता तो त्याच्या दुसऱ्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. ‘बाघी’ प्रेमकथा असून तो त्याच्या प्रेमासाठी लढताना दिसेल.

नव्या जोडय़ांना एका सिनेमात बघण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात येतो, असा सिनेकर्त्यांचा समज आहे. एकाअर्थी तो खराही आहे. पण, असे नव्या जोडय़ांचे सिनेमे या एकमेव कारणामुळे चालतातच असं नाही. याची उदाहरणं गेल्या वर्षी बघायला मिळाली आहेत.

रणबीर कपूर-अनुष्का शर्माचा ‘बॉम्बे वेलवेट’ जबरदस्त पडला. अनुराग कश्यपचा सिनेमा म्हणून त्याचा प्रचंड गवगवा झाला होता. प्रत्यक्षात मात्र या सिनेमाच्या पदरी अपयशच आलं. सोनाक्षी सिन्हा-अर्जुन कपूरचा ‘तेवर’ हा ‘आर. राजकुमार’ या सिनेमाचा सख्खा धाकटा भाऊ होता असंच वाटत होतं. रणबीर कपूर-जॅकलीन फर्नाडिस यांचा ‘रॉय’ हा सिनेमा ऑफबीट पठडीतला म्हटला गेला पण, त्याचंही फार बरं चाललं नाही. ‘एबीसीडी’च्या यशानंतर ‘एबीसीडी टू’लाही तसाच प्रतिसाद मिळेल असं वाटल्यामुळे सिक्वेलमध्ये नव्या कोऱ्या जोडीला घेतलं गेलं. श्रद्धा कपूर-वरुण धवन ही जोडी सिनेमात असली तरी सिनेमा पहिल्या भागासारखी लोकप्रियता मिळवू शकला नाही. कंगना राणावत-इम्रान खान या जोडीचा ‘कट्टी-बट्टी’ हा सिनेमा तर प्रेक्षकांना आठवतही नसेल इतका अपयशी ठरला. बिपाशा बासू-करणसिंग ग्रोव्हरचा ‘अलोन’, अभिषेक बच्चन-असीन यांचा ‘ऑल इज वेल’, आलिया भट-शाहिद कपूरचा ‘शानदार’ हे फारसे न चाललेले सिनेमे आहेत. याला अपवाद ठरला ‘प्रेम रतन धन पायो’ हा सिनेमा. आता हा अपवाद का ठरला हे वेगळं सांगायला नको. त्याच्या बॉक्स ऑफीसवर हिट होण्याचं एकमेव कारण म्हणजे सलमान खानचा प्रचंड मोठा चाहता वर्ग हे आहे. ‘बदलापूर’ आणि ‘पिकू’ हे दोन्ही आशय-विषयात चांगले ठरले तरी बॉक्स ऑफीसवर चमक दाखवू शकले नाहीत.

त्यामुळे नव्या जोडय़ांचे सिनेमे लोकप्रिय, यशस्वी होतात असा निकष नेहमी लावणं चुकीचं आहे.

आदित्य रॉय कपूर तसा बरा अभिनेता. पण त्याच्या वाटय़ाला फारसे चांगले सिनेमे आले नाहीत. ‘आशिकी टू’ आणि ‘ये जवानी है दिवानी’नंतर त्याने एकच सिनेमा केला पण, तोही आपटला. दोन वर्ष हा अभिनेता शांत राहिला. आता त्याचा ‘फितूर’ येतोय. तेही कतरिना कैफसोबत. दोन वर्षे सातत्याने पदरी निराशा आल्यानंतर कतरिनामुळे का होईना पण ‘फितूर’ आदित्यसाठी किती फायदेशीर ठरतोय हे बघावं लागेल. यामी गौतमीचा आयुषमान खुरानासोबत ‘विकी डोनर’ हा सिनेमा हिट झाला. पण त्यानंतर ती काही सिनेमात दिसली असली तरी फार चमक दाखवू शकली नाही. लवकरच तिचा पुलकीत सम्राटसोबत ‘सनम रे’ हा सिनेमा येतोय. आत्तापर्यंत तिने वेगवेगळ्या नायकांसोबत काम केलंय. आता ही नवी जोडी प्रेक्षकांना आवडते का ते लवकरच कळेल. सिनेमा चांगला असो वाईट बॉक्स ऑफीसवर घसघशीत कमाई करणारी सध्याची एक नायिका म्हणजे आलिया भट. या वर्षी तिही एका वेगळ्या नायिकासोबत सिनेमा करतेय. ‘कपूर अ‍ॅण्ड सन्स’ या आगामी सिनेमात ती फवाद खानसोबत दिसतेय.

बॉलीवूडमध्ये येत असलेल्या अनेक ट्रेंड्सपैकी एक म्हणजे चरित्रपट सिनेमे. मध्यंतरी अशा सिनेमांची लाट आली होती. आता यात भर पडतेय एका क्रिकेटपटूची. मोहम्मद अझरुद्दीन या क्रिकेटरच्या आयुष्यावर ‘अझर’ हा सिनेमा येत आहे. इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत नर्गिस फक्री असेल. ही जोडीसुद्धा पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे. सिनेमाचा विषय, बाज लोकप्रिय आहे. त्यामुळे सिनेमाकडूनही अपेक्षा आहेत. ‘सरबजित’ हा आणखी एक चरित्रपट या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रणदीप हुडा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात ऐश्वर्या रॉय बच्चनही असेल. तिची या सिनेमातली भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. त्यामुळे दोघांचं सिनेमातलं नातं सांगता येत नाही. तरी दोघे पहिल्यांदाच एकत्र एका सिनेमात झळकणार आहेत. रणदीप हुडाचा आणखी एक सिनेमा या वर्षी आहे. ‘दो लफ्जों की कहानी’ या सिनेमात तो काजल अग्रवालसोबत दिसणार आहे. सिनेमाच्या शीर्षकावरून प्रेमकथा आहे हे कळतंय. ही नवी कोरी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल की नाही हे सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादावरून लक्षात येईल. अजय देवगण सध्या फॉर्मात आहे. त्यामुळे त्याचा एकही सिनेमा असं होणार नाही. ‘बादशाहो’ या सिनेमात तो श्रुती हसनसोबत दिसणार आहे. अजय देवगण अनेकदा नवनवीन नायिकांसोबत दिसतो. नव्या नायिकांसोबतचे त्याचे काही सिनेमे लोकप्रियही झाले आहेत. त्यामुळे ‘बादशाहो’कडून अपेक्षा करायला हरकत नाही.

एकुणात, सिनेमात नव्या जोडय़ा घेतल्या की, दोन्ही कलाकारांचा वेगवेगळा चाहता वर्ग एकाच वेळी एका सिनेमासाठी एकत्र होतो हे व्यावसायिक गणित सिनेमाकर्ते आजमवू पाहताहेत. पण, गेल्या वर्षीचे नव्या जोडय़ांचे सिनेमे पाहता याही वर्षी तसा प्रयोग करण्याचं आव्हान कितपत पेललं आहे, हे सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतरच समजेल. तोवर नव्या जोडय़ांचे कोणकोणते सिनेमे आपल्या ‘टू वॉच मूव्हीज’ या यादीत ठेवायचे ते ठरवू या..!
चैताली जोशी –