संजय लीला भन्साळी यांच्या आगामी सिनेमात अभिषेक बच्चन आणि प्रियांका चोप्रा ही जोडी एकत्र दिसेल असे म्हटले जात होते. साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमकथेवर आधारित या सिनेमात अमृताची भूमिका प्रियांका साकारणार असल्याचे जवळपास निश्चित झाले होते. तर साहिर यांच्या व्यक्तिरेखेसाठी भन्साळी यांचा अजून शोध सुरू असल्याचे म्हटले जात आहे. या भूमिकेसाठी अभिषेक बच्चनचे नाव समोर येत होते. पण जसे अभिषेकचे नाव समोर आले तसे प्रियांकाने हा सिनेमा सोडल्याची बातमीही आली. अभिषेकच्या नावानंतर प्रियांकाने सिनेमा करण्यास नकार का कळवला हे मात्र कळत नव्हते.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, प्रियांकाने अभिषेकला नकार देण्याचे मुख्य कारण ऐश्वर्या राय आहे. त्याचे झाले असे की, रोहन सिप्पी यांच्या एका सिनेमात ऐश्वर्याला डावलून प्रियांकाची वर्णी लावण्यात आली होती. पण ऐश्वर्याला काढल्यामुळे अभिषेकने प्रियांकासोबत काम करण्यास नकार दिला होता. आता इतक्या वर्षांनी ही संधी प्रियांकाला मिळाल्याने तिने भन्साळी यांच्या आगामी सिनेमात अभिषेकसोबत काम करण्यास स्पष्ट नकार दिला.

आता प्रियांकाने या सिनेमाला नकार कळवल्यामुळे भन्साळी या सिनेमासाठी नवीन अभिनेत्रीच्या शोधात आहेत. यासाठी ऐश्वर्याचाही विचार केला जात आहे. जर या सिनेमासाठी ही पती- पत्नीची जोडी एकत्र आली तर त्यांचा हा एकत्रीत असा नववा सिनेमा असेल. २००० मध्ये आलेल्या ‘ढाई अक्षर प्रेम के’ या सिनेमात अॅश- अभी यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते. यानंतर ‘कुछ ना कहो’, ‘बंटी और बबली’, ‘उमराव जान’, ‘धूम २’, ‘गुरू’, ‘सरकार राज’ आणि मणी रत्नम यांच्या ‘रावण’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केले. संजय लीला भन्साळी आणि ऐश्वर्या ही दिग्दर्शक- अभिनेत्रीची जोडी या आधीही हिट ठरली आहे. दोघांनी संजय लीला भंसाळींसोबत ऐश्वर्याने याआधी ही काम केले आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’ आणि ‘गुजारिश’ या सिनेमांसाठी एकत्र काम केले.