सोशल मीडियावर दर दिवशी नवनवीन कॉन्ट्रोव्हसी पाहायला मिळतात. काही कलाकार त्यांची मतं फेसबुक, ट्विटरवर शेअर करतात. मग एखाद्याचे मत दुसऱ्याला पटले नाही की त्यांच्यात शाब्दिक चकमक होते. सध्या असे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर आपआपसात वाद घालताना दिसतात. 'बेवॉच' या सिनेमाच्या प्रमोशनवेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अभिनेत्री प्रियांका चोप्राला सोशल मीडियावर होणाऱ्या या वादांबाबत विचारण्यात आले असता ती म्हणाली की, 'मला खरं बोलायची सवय आहे. त्यामुळे मी खरं बोलते याचं वाईट वाटून घेऊ नका. पण, तुम्ही लोकंच याला अधिक महत्त्व देतात. माझं प्रत्येक ट्विट एक बातमी बनते. माझे ट्विटरवर लाखो फॉलोवर्स आहेत. ते माझे वाचतात ट्विट्स. मग पुन्हा त्याची बातमी करायची काय गरज आहे?' एवढं बोलून प्रियांका थांबली नाही. ती पुढे म्हणाली की, 'तुम्हीच याला अधिक महत्त्व दिलं की ती कॉन्ट्रोव्हर्सी बनते. पण मुळात ती नसते. आपण अशा देशात राहतो जिथे प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. हेच शिक्षण आपण आपल्याला मुलांना द्यायचं आहे. माझ्या पालकांनी मला नेहमीच आपण लोकशाहीमध्ये राहतो याची शिकवण दिली. न घाबता आपले मत मांडण्याची, सत्याच्या बाजूने उभं राहण्याची शिकवण दिली. मुलींना नेहमी 'तुम्ही बोललं नाही पाहिजे' असंच सांगितलं जातं. पण माझ्या बाबांनी मला वेगळे संस्कार दिले. तेच संस्करा मला पुढच्या पिढीला द्यायचे आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्याची स्वतःची मतं आहेत. ती योग्य अयोग्य अशी कधीच नसतात. त्यामुळे मतावरुन ती व्यक्ती कशी आहे हे ठरवणं फार चुकीचं आहे.' दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभय देओलने फेअरनेस क्रीमवर त्याला वाटणारे मत फेसबुकद्वारे सर्वांसमोर जाहीर केले होते. थोड्याच वेळात हा प्रत्येकाच्या तोंडी याच विषयाचे बोलणे ऐकायला मिळाले. काहींनी यावर मौन बळगले तर काहींनी त्याच्या मतांना विरोध दर्शवला. त्यानंतर सोनू निगमनेही अझानच्यावेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊड स्पिकरबाबत एक वक्तव्य केले होते. हे प्रकरण नंतर फार चिघळले गेले. सोनूने मुंडन करून या प्रश्नाला पूर्णविरामही दिला. सोनूचे हे प्रकरण संपतय न संपतय तोच सोनाक्षीने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाऊ नये यासाठी अनेक गायकांकडून एकच सूर आळवला गेला.