‘कहो ना प्यार है’ या चित्रपटापासून ते अगदी ‘क्रिश’ या चित्रपटाच्या विविध भागांपर्यंत सुपरहिट चित्रपट देणारे निर्माते-दिग्दर्शक राकेश रोशन सध्या प्रचंड चर्चेत आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखती दरम्यान रोशन यांनी अनेक विषयांवर त्यांची मते मांडली आहेत. या मुलाखतीदरम्यान ‘तुम्ही फक्त तुमच्या मुलासोबतच चित्रपट का बनवता?’ या प्रश्नाचे अतिशय विचारपूर्वक उत्तर राकेश रोशन यांनी दिले. ‘हृतिकसारखा प्रतिभावान मुलगा असताना मला इतर कोणत्याही अभिनेत्याच्या शोधात इतरत्र फिरण्याची गरजच नाही’ असे ते म्हणाले.

हिंदी चित्रपट म्हणजेच बॉलिवूड आणि हॉलिवूडची तुलना करण्याविषयाचे मतही राकेश रोशन यांनी या मुलाखतीदरम्यान मांडले. ‘भारतीय चित्रपटांकडे हॉलीवूडच्या चित्रपटांप्रमाणे बजेट नसतो. त्यांच्या चित्रपटांचे बजेट केव्हाकेव्हा तर ३ हजार कोटींपर्यंतही असतात. हे आपण नाही करु शकत. त्यामुळे आपल्या चित्रपटांना कथानकाचाच आधार असतो’, असे राकेश रोशन म्हणाले.
वाचा: हृतिक आणि कंगनाबद्दलचे सत्य जाणून अनेकांना धक्काच बसेल- राकेश रोशन
राकेश रोशन आणि हृतिक ही कलाकार बाप बेट्यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘क्रिश ४’ या चित्रपटाच्या निमित्ताने हृतिक पुन्हा एकदा सुपरहिरोच्या रुपात दिसणार आहे. ‘क्रिश’ या गाजलेल्या चित्रपटाचा चौथा भाग बनवण्याची कल्पना कशी सुचली यावरुनही राकेश रोशन यांनी पडदा उचलला. ‘क्रिश’चा मुखवटा लावलेल्या गणपतीचा फोटो रोशन यांना त्यांच्या पत्नीने जेव्हा दाखवला’, त्यामुळेच ही कल्पना सुचली असे राकेश रोशन यांनी सांगितले. या मुलाखतीमध्ये राकेश रोशन यांनी हृतिक आणि कंगनामध्ये चाललेल्या वादावरही आपले मत त्यांनी मांडले. हृतिकची बाजू घेत त्यांनी ‘हृतिकच्या आगामी चित्रटाचे काम पूर्ण होताच तो, याविषयी त्याची बाजू उघड करेल आणि जर त्याने याविषयीचे सत्य उघड केले तर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसू शकेल’ असेही ते म्हणाले.