कतरिना कैफ आणि रणबीर कपूर या प्रेमी जोडीत आलेल्या दुराव्याचा फार मोठा फटका त्यांच्या आगामी ‘जग्गा जासूस’ला बसणार याविषयी चर्चा सुरू झाली होती. आधीच काही ना काही कारणांमुळे रखडलेला हा चित्रपट पुन्हा पुढे ढकलण्यात येणार असल्याचीही वदंता होती. मात्र बॉलीवूडचे कलाकार सध्या वैयक्तिक नातेसंबंध बाजूला ठेवून व्यावसायिकता जपण्याच्या बाबतीत आग्रही आहेत, याचा प्रत्यय या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकवार आला आहे. ‘जग्गा जासूस’चे अखेरचे चित्रीकरण सत्र कतरिनाशिवायच सध्या सुरू झाले आहे.

कतरिना सध्या ‘फितूर’च्या प्रसिद्धी कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. मात्र तिच्या चित्रपटाचा आणि आपल्या आयुष्यात घडलेल्या या घटनांचा कुठलाही बाऊ न करता रणबीरने चित्रीकरणाला सुरुवात करून सगळ्यांनाच धक्का दिला आहे. ‘जग्गा जासूस’चे चित्रीकरण आता अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या चित्रपटासाठी मुंबईतच कोलकाता शहराचा सेट लावण्यात आला असून रणबीरने चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. कतरिनाचे चित्रीकरण नसल्याने आता रणबीरने तिच्याशिवाय चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. मात्र लवकरच ते दोघेही एकत्र येऊन उर्वरित चित्रीकरण पूर्ण करतील, असे सेटवरच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

‘जग्गा जासूस’चे चित्रीकरण सुरू झाले तेव्हा तो रणबीर आणि कतरिनाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा चित्रपट होता. रणबीरचे हे पहिलेच होम प्रॉडक्शन असल्याने कतरिनासाठीही तो चित्रपट तितकाच महत्त्वाचा होता. याशिवाय, एका गॅपनंतर हे दोघेही रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आणि त्यांना एकत्र काम करायला मिळणार, असा दुहेरी आनंद या प्रेमी जोडप्याच्या मनात होता. मात्र काही ना काही कारणाने चित्रपटाचे चित्रीकरण रखडत गेले. दरम्यानच्या काळात रणबीरच्या कारकीर्दीत दीपिकाबरोबरचा ‘तमाशा’ आला आणि कतरिनानेही ‘फितूर’ला सुरुवात केली. त्यामुळे आधीच चित्रीकरणामुळे हे जोडपे दुरावले गेले. त्यानंतर हा दुरावा वाढतच गेला आणि जितक्या लवकर ते एकत्र आले होते तितक्याच वेगाने ते वेगवेगळेही झाले. त्यामुळे प्रेमाने सुरू झालेल्या चित्रपटाचे चित्रीकरण एकमेकांच्या अबोल्याने पूर्ण होणार आहे, हे या चित्रपटाचे दुर्दैवच म्हणायला हवे. याआधी शाहीद कपूर आणि करिना कपूर यांच्या ‘जब वी मेट’ दरम्यानही असेच घडले होते. चित्रपट संपता-संपता या दोघांचेही नाते संपुष्टात आले होते. रणबीर-कतरिनाच्या बाबतीत त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. मात्र चित्रीकरणासाठी का होईना दोघेही एकत्र येणार असून पवईच्या चांदिवली स्टुडिओत पुढचे चित्रीकरण पार पडणार असल्याचे समजते.