बॉलिवूडची सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन तिच्या पहिल्या मुलीच्या म्हणजेच आराध्याच्या जन्मापासून रुपेरी पडद्यापासून दुरावली होती. त्यानंतर आराध्या बऱ्यापैकी मोठी झाल्यानंतर ऐश्वर्याने ‘जज्बा’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. आता ती लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात येणार असल्याचं म्हटलं जातंय. चिरंजीवीच्या आगामी ‘उय्यलवाडा’ चित्रपटासाठी निर्मात्यांनी ऐश्वर्याला विचारणा केल्याचे म्हटलं जातंय. पण, ऐश्वर्याने या चित्रपटासाठी अव्वाच्या सव्वा मानधनाची मागणी केल्याने निर्मात्यांनी तिच्या नावावर काट मारल्याची चर्चा आहे.

वाचा : अजय देवगणमुळेच मी अजूनही अविवाहित- तब्बू

ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटांच्या वार्ता सुरु असतानाच तिने या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणात मानधन मागितल्याचे आणि चित्रपटाची कथा ऐकल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले जातेय. सूत्रांच्या माहितीनुसार, ऐश्वर्या चित्रपटासाठी बक्कळ मानधनाची मागणी करत असल्याचे वृत्त अर्थहीन आहे. तिला केवळ भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती आणि तिने चित्रपटाचा केवळ सारांश वाचला होता. ऐश्वर्या न्यू यॉर्कवरून परतल्यानंतरच तिची आणि चिरंजीवीची भेट होणार आहे.

वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा

गेल्या काही दिवसांपासून निर्माते, चिरंजीवाचा मुलगा राम चरण यांनी ऐश्वर्याची भेट घेऊन तिला चित्रपटाची कथा ऐकवल्याची चर्चा आहे. पण, ऐश्वर्या सध्या न्यू यॉर्कला असल्यामुळे तिला फक्त चित्रपटाचा सारांशच माहित आहे. आतापर्यंत चित्रपटासाठी चिरंजीवी व्यतिरीक्त केवळ अभिनेता रवी किशनचीच निवड करण्यात आली आहे. रवी यात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. चिरंजीवीचा हा १५१वा चित्रपट असून तो स्वातंत्र्य सेनानी उय्यलवडा नरसिंह रेड्डी यांच्यावर आधारित आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद परशुरी ब्रदर्स या प्रसिद्ध लेखक बंधूच्या जोडीने लिहिले आहेत. राम चरणचा स्वतःचा बॅनर असलेलं कोनिडेला प्रॉडक्शन या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.