प्रत्येक दगड हा केवळ दगड नसतो. त्याच्याकडे पाहण्याची आपली दृष्टी त्याचं सौंदर्य ठरवत असते. हे अगदी सहजतेने चित्रपटाच्या सुरुवातीला एका प्रसंगात येऊन जातं. संपूर्ण चित्रपटात पुन्हा या दगडाचा कुठेही थेट उल्लेख नसला तरी चित्रपटाचा एकूण आशय लक्षात घेतल्यास त्या दगडाचं (प्रसंगाचं) महत्त्व लक्षात येईल. तरुण दिग्दर्शक वरुण नार्वेकरचा ‘मुरांबा’ हा चित्रपट सध्या चच्रेचा विषय आहे. ‘तुमच्या घरातली आमची गोष्ट’ या टॅगलाइनसह चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटाने मराठी सिनेमा कसा बदलतो आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिलंय. मराठी सिनेमात कथा हीच प्रमुख पात्र असते असं बोललं जातं. ‘मुरांबा’ही त्याला अपवाद नाही, पण कथेसोबतच चित्रपटाची मांडणी आणि कलाकारांचा अभिनय हीदेखील या सिनेमाची बलस्थानं आहेत. चित्रपट जाणकारांनी या सिनेमाचं कौतुक करताना ‘आर्ट ऑफ सिनेमा’, ‘खरी अर्बन मराठी फिल्म’, यापूर्वी कधीच न चाखलेला, आत्ताच्या नात्याचा शोध घेणारा चित्रपट अशी विशेषणं वापरली आहेत. ती हा सिनेमा पाहिल्यावर किती अचूक आहेत हे लक्षात येतं.

स्वतंत्रपणे पहिलाच सिनेमा असला तरी वरुण नार्वेकरची सिनेमा माध्यमावरील पकड जबरदस्त आहे. कथा-पटकथा-दिग्दर्शन त्याचंच असल्याने आपण काय लिहिलंय आणि ते कसं मांडायचंय याची स्पष्टता त्याच्या विचारांमध्ये दिसते. सिनेमा सुरू झाल्यापासून प्रेक्षक सिनेमा नक्की कशावर भाष्य करतोय याचे तर्कवितर्क लढवत असतात. त्यामुळे प्रसंगागणिक वाढत जाणारी उत्सुकता तुम्हाला खिळवून ठेवते आणि शेवटी जे काही हाती लागतं, ते कल्पनेपलीकडचं नेहमीच्या आयुष्यातील वास्तव असतं. सिनेमातून आजघडीला सर्वात दुर्लक्षित असणाऱ्या विषयावर चपखल भाष्य केलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते ज्या पद्धतीने मांडलंय त्याला तोड नाही. सुनील सुकथनकर आणि सुमित्रा भावे यांसारखे कसलेले दिग्दर्शक आणि संवेदनशील व्यक्तींच्या मुशीत तयार झालेल्या या तरुण दिग्दर्शकाने आपला पहिला सिनेमा बनवताना इतक्या महत्त्वाच्या पण दुर्लक्षित विषयाला हात घातला याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नात्यांचे पापुद्रे गळून पडत असताना संवाद किती महत्त्वाचा आहे याची जाणीव हा सिनेमा करून देतो.

कुटुंब, नाती, प्रेम, प्रेमभंग, मागची-आजची पिढी, शहरी वास्तव, स्पर्धात्मक आयुष्य.. तुमच्या घरातली नेमकी कुठली गोष्ट कथेत लपली आहे याचा शोध घेण्याची मोकळीक हा सिनेमा देतो. एवढंच नव्हे तर प्रत्येक गोष्ट किती मुरलेली आहे याबाबतही विचार करायला भाग पाडतो. या सिनेमाचा नायक नायिकेला पटवण्यासाठी गाणी गात नाही (‘अगं ऐक ना’, या गाण्यात तो गात असला तरी ते गाणं सिनेमात नाही), स्टंट करत नाही, श्वास न घेता लांबलचक संवाद झोडत नाही किंवा सतत कुणाच्या तरी मदतीला धावूनही जात नाही. त्याचंच बोट पकडून आपण संपूर्ण सिनेमा पाहतो, पण तरीसुद्धा सिनेमातील इतर पात्र आणि विषयांचं अस्तित्व उत्तम प्रकारे अधोरेखित होतं. मुरांब्याची खरी चव अनुभवायची असेल तर तो नीट मुरायला हवा. मग तो फक्त तोंडी लावण्यापुरता असला तरी त्याचं पानावरील स्थान रोजच्या जेवणात पक्कं होऊन जातं. नात्यांचंही तसंच आहे. नातं घट्ट व्हायचं असेल तर सर्व घटक महत्त्वाचे असतात आणि मुख्य म्हणजे शेवटपर्यंत ते नातं टिकवण्यासाठी लागणारा समजूतदारपणा. दोघांनीही हा समजूतदारपणा दाखवणं गरजेचं असतं. ‘मुरांबा’मधील नायक बाहेरच्या जगातील स्पध्रेला घाबरणारा आहे. अपयशी होणं त्याला मान्य नाही. तर दुसरीकडे आपल्या करिअरवर फोकस करणारी नायिका प्रगतीची एक एक शिखरं पादाक्रांत करत असते. त्यात स्त्री म्हणून तिचं बदललेलं वागणं, मोकळेपणा आणि विचारांची स्पष्टता नायकाला खटकते. यामुळे नायक-नायिकेच्या नात्यात वितुष्ट निर्माण होतं. नायिकेला नायकाचं हे वागणं लक्षात आल्यावर ती त्याला आपल्यापरीने समजावण्याचा प्रयत्न करते, पण मग प्रेमाच्या नात्यात आडवा येतो अहंकार. ही एक अशी गोष्ट आहे, जी अनेक चांगल्या गोष्टींचा एका क्षणात विचका करून टाकते. ‘मुरांबा’मधील आलोक आणि इंदूच्या प्रेमभंगालादेखील हाच अहंकार कारणीभूत ठरतो. पण दिग्दर्शकाने तो टिपिकल पद्धतीने न मांडता त्याला अनेक पदर जोडले आहेत. त्यातूनच आजघडीच्या या भयाण वास्तवाची जाणीव अतिशय प्रभावीपणे समोर येते. आपल्याला काय सांगायचं आहे याची स्पष्टता असली तर त्याला भाषेचं बंधन असायला नको. ‘मुरांबा’ हेच अधोरेखित करतो. मराठी चित्रपट आणि सेक्स म्हणजे टॅबूच. सेक्ससंबंधी कुठलाही प्रसंग मराठी सिनेमात आला तर डोळे बंद करू की कान अशी तारांबळ उडते. अर्थात ती मांडण्याची पद्धतही त्याला कारणीभूत आहे. पण या सिनेमात सेक्स हा विषयही खूप चांगल्या पद्धतीने हाताळला आहे. कुटुंबासोबत सिनेमा पाहताना ते प्रसंग ओंगळवाणे वाटत नाहीत. सेक्ससंबंधी प्रत्येक प्रसंगाची सुरुवात, चढता आलेख आणि शेवट इतका छान चित्रित केलाय की तो कथेला अधिक समृद्ध करतो. नाही म्हटलं तरी पिढीतील अंतरामुळे आई-वडिलांसमोर या विषयावर बोलायला आजची पिढी कचरत असली तरी आईवडिलांना आपली मुलं कुठवर पोहोचली आहेत याची चांगलीच जाण आहे. याची जाणीव कथाकाराने आईच्या केवळ एका वाक्यातून करून दिली आहे. इथे पुन्हा एकदा दिग्दर्शक आपलं वेगळेपण सिद्ध करतो.

सिनेमातील पात्र तुमच्या-आमच्यातील आणि प्रामाणिक वाटतात. योग्य कलाकारांची निवड हा मूलभूत नियम इथे लागू होत असला तरी पात्रांचे संवाद, ते बोलण्याची पद्धत यामुळे ते कुठे अभिनय करताहेत असं वाटत नाही. सिनेमातल्या तरुण जोडीसोबतच सीनियर जोडीने याबाबत चमकदार कामगिरी केली आहे. दोन पिढय़ांमधील संवाद दाखवताना दोन टोकाच्या भूमिका मांडणं सोप्पं काम आहे. परंतु इथे समान पातळीवर येऊन संवाद घडवून आणण्याचं शिवधनुष्य कथाकाराने मोठय़ा खुबीने पेललंय. तो संवाद फक्त दोन पिढय़ांमधला नाहीये. दोन पिढय़ांमधील त्यांच्या-त्यांच्यातलाही संवाद आहे. त्यातला संयम आणि उथळपणा निखालसपणे अधोरेखित करण्यात आलाय. आई-मुलगा, बाप-मुलगा, आई-वडील, प्रियकर-प्रेयसी, सासू-सून, सासरा-सून, सासरा-जावई, मित्र-मित्र यांच्यामधील संवादात आणि एकमेकांसोबत वागण्यातही ठळकपणे जाणवेल असं वैविध्य आहे.

सिनेमा चित्रित करतानाही प्रत्येक फ्रेम नवीन पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. मुख्य म्हणजे ती सुटसुटीत आहे. गरज नसताना काहीतरी हटके अँगल लावून कलाकारी दाखवण्याचा किंवा गिमिक करण्याचा कुठेच प्रयत्न केलेला नाही. लोकेशन्सही वास्तवातील आहेत. नायक आणि वडिलांमधील अतिशय महत्त्वाचा आणि शेवटचा प्रसंग घरातील स्टडीमध्ये चित्रित करण्याची कल्पनाच भारी आहे. आपण जे काही वाचतो, ऐकतो, अनुभवतो ते अंगी बाणवायला विसरतो. ते स्वत:मध्ये मुरवायला हवं, याची जाणीव हा प्रसंग आणि ती जागा करून देते. नात्यांचा नव्याने शोध घ्यायला हा सिनेमा मदत करतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. लंचला गेल्यावर वडिलांनी सर्वासाठी वाइन ऑर्डर करणं, आईने त्यामध्ये पाणी टाकून पिणं, पत्नीला गाडी चालवण्याचा आत्मविश्वास देणं, आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस विसरल्याबद्दल मुलाने खजिल होणं, मुलाच्या मित्रालासुद्धा मुलाप्रमाणेच वागवणं, नायकाने प्रेयसीसमोर चूक कबूल करणं अशा कितीतरी प्रसंगांतून या सिनेमाचं कालसुसंगत असणं अधोरेखित होतं.

वरुण नार्वेकरने चांगल्या कै ऱ्या निवडून आणि तो उत्तमरीत्या मुरवून फक्कड ‘मुरांबा’ तयार केला आहे. खरंतर बऱ्याच गोष्टी लिहिता येतील पण ‘मुरांबा’ पुरवून पुरवूनच खाल्लेला चांगला. शेवटी या सिनेमाबद्दल इतकं गोड लिहिल्याबद्दल कदाचित तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळंच काय गोड गोड लिहिलंय. पण याच सिनेमात एक वाक्य आहे- मुलगा आपल्या वडिलांना म्हणतो, ‘काय असे गोड गोड काय वागताय?’ त्यावर बाबा म्हणतात, ‘एक मिनीट एक मिनीट.. मी गोडच आहे.’