रोहित शेट्टी दिग्दर्शित 'गोलमाल रिटर्न्स' हा सिनेमा २००८ मधला एक हिट सिनेमा होता. पण, खुद्द रोहितलाच हा सिनेमा खूप बकवास सिनेमा वाटतो. बॉलिवूड स्टार अजय देवगण, करिना कपूर खान, तुषार कपूर आणि अर्शद वारसी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात होत्या. २००६ मध्ये प्रदर्शित झालेला 'गोलमाल- फन अनलिमिटेड' या सिनेमाचा हा रिमेक होता. मुंबईमध्ये आयोजित १८ व्या आंतरराष्ट्रीय मामि चित्रपट महोत्सवामध्ये एका परिसंवादामध्ये रोहितने सांगितले की, 'शूटिंगच्या दरम्यानच मला वाटायला लागलं होतं की काही तरी चुकतं आहे. मी एका ठराविक प्रेक्षकांना डोक्यात घेऊन सिनेमा बनवतो. तेव्हा मला जाणवत होते की त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हा सिनेमा बनला नाहीए. माझे हे अंदाज आतापर्यंत दोन ते तीन वेळा खरे ठरले आहेत.' जेव्हा एखादा तुझा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरत नाही, तेव्हा तू स्वतःला कशाप्रकारे पुन्हा एकदा नव्याने काम करायला प्रेरित करतोस असा प्रश्न माध्यमांकडून विचारला गेला तेव्हा तो म्हणाला की, 'आपण प्रत्येकवेळी स्वतःला सुधारतच असतो. काही कारणांमुळे अनेकदा गडबडच होते. एवढेच नाही तर सिनेमा हिट जरी झाला तरी आमची संपूर्ण टीम एकत्र बसून यावर चर्चा करतो. २००८ मध्ये 'गोलमाल रिटर्न्स' हिट सिनेमांपैकी एक होता. पण आम्हाला माहित होते की हा खूप बकवास सिनेमा होता.' रोहितने शाहरुख खानसोबत 'चेन्नई एक्सप्रेस' यासारखा हिट सिनेमाही दिला आहे. तरी सुमारे पाच वर्षांनंतर काजोल आणि शाहरुख यांची सुपर हिट जोडी त्याच्या 'दिलवाले' या सिनेमातून एकत्र आली. पण तरीही हा सिनेमा पाहिजे तेवढा गल्ला कमवण्यात अपयशी ठरला होता. याबाबत बोलताना रोहीत म्हणाला की, 'दिलवाले'च्या कथेत आम्ही मार खाल्ला तर 'सिंघम रिटर्न्स'मध्ये व्यक्तिरेखेमध्ये आम्ही चुकलो.